सद्यकाळात 65 टक्के प्रवासी रेल्वेंचे संचालन
नवी दिल्ला
भारतीय रेल्वे 1 एप्रिलपासून सर्व रेल्वेगाडय़ा पुन्हा सुरू करू शकते. या निर्णयासंबंधी रेल्वेने पूर्ण तयारी केली आहे. रेल्वेने मागील वर्षी कोरोना महामारीमुळे राष्ट्रीय टाळेबंदीदरम्यान 25 मार्च 2020 रोजी सर्व रेल्वेगाडय़ांचे संचालन बंद केले होते. याच्या काही काळानंतर केवळ विशेष रेल्वेगाडय़ांचे संचालन सुरू करण्यात आले होते. सद्यकाळात देशभरात सुमारे 65 टक्के रेल्वेगाडय़ा धावत आहेत. 29 मार्च रोजी होळीचा सण असून त्या काळात रेल्वेगाडय़ांची मोठी मागणी असते. अशा स्थितीत रेल्वेंअभावी प्रवाशांना त्रास होऊ नये याकरता आणखीन काही प्रवासी रेल्वे सुरू केल्या जाऊ शकतात. कोरोनाचा प्रभाव कमी होताच रेल्वेने टप्प्याटप्प्याने रेल्वेगाडय़ा सुरू करण्याचा प्रयत्न चालविला आहे. सध्या केवळ कोविड विशेष रेल्वेफेऱया सुरू आहेत. आयआरसीटीसीने स्वतःच्या पेमेंट गेटवे आय-पेमध्ये ऑटो पेचे वैशिष्टय़ जोडले असून याद्वारे वापरकर्त्याला तिकीट नोंदणी करताना कमी वेळ लागणार आहे. याचबरोबर तत्काळ तिकीट ऑटो-कॅन्सल झाल्याच्या स्थितीत रिफंड टाइमही कमी झाला आहे. आयआरसीटीसीद्वारे रेल्वेची 83 टक्क्यांहून अधिक तिकीटे आरक्षित होतात. कोरोनापूर्वी देशात प्रतिदिन 2.30 कोटी लोक रेल्वेप्रवास करत होते, हे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. चीनमध्ये प्रतिदिन सर्वाधिक 69 लाख लोक रेल्वेप्रवास करतात.