वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
येत्या 1 एप्रिलपासून मोबाईल कॉल दर व इंटरनेट दर वाढवला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. दूरसंचार कंपन्या दर वाढवण्याच्या तयारीत आहेत. परिणामी 1 एप्रिलपासून मोबाईलवर बोलणे महागात पडणार आहे.
रेटींग एजन्सी इक्राने दर वाढीबाबत अंदाज व्यक्त केला आहे. त्यांच्या माहितीनुसार 1 एप्रिलपासून विविध दूरसंचार कंपन्या आपल्या कॉल व इंटरनेट दरात वाढ करतील. कोरोना संकटाच्या काळात इतर क्षेत्राप्रमाणेच दूरसंचार कंपन्याही अडचणीत सापडल्या होत्या. त्यांच्या सरासरी महसुलामध्ये वाढ झाली होती. पण तुलनेने वाढत्या खर्चाकडे पाहता सदरचा महसूल फारसा लाभदायक कंपन्यांसाठी राहिला नाही. त्यामुळे कंपन्यांना मोबाईल कॉल व इंटरनेट दरात वाढ करून भरपाई करणे गरजेचे ठरणार आहे. त्या दिशेने कंपन्या आगामी काळात आपला नवा दर सादर करू शकतात. या आधीही दूरसंचार कंपन्यांनी दरात वाढ केली होती. 15 दूरसंचार कंपन्यांनी 30254 कोटी रुपये फेडले होते.
इक्राच्या माहितीनुसार अनेक ग्राहक 2जीतून 4 जी सेवेचा लाभ घेत आहेत. 4 जी सेवेत वाढलेल्या व्यवहारांमुळे कंपन्यांना महसूल चांगला प्राप्त करता येत आहे. दर वाढीनंतर टेलिकॉम कंपन्यांच्या महसूलात 11 ते 13 टक्के इतकी वाढ दिसणार आहे.