ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात वाढत असलेला कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचा कालावधी 1 जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. यासंबंधी ठाकरे सरकारकडून नवीन नियमावली आज (गुरुवारी) जारी करण्यात आली आहे.
ठाकरे सरकारने निर्बंध अजून कठोर केले असून बाहेरुन राज्यात येणाऱ्या लोकांना आरटीपीआसीरआर टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे. तसेच 48 तासांचा निगेटिव्ह अहवाल असणे गरजेचे आहे. कारण महाराष्ट्रातील रुग्णसंख्या कमी होत असली तरी आजूबाजूच्या राज्यातील रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे इतर राज्यातून संसर्ग येऊ नये म्हणून राज्य सरकारकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. दरम्यान देशातील कोणत्याही भागातून राज्यात येणाऱ्यांसाठी आधीचे नियम लागू असतील.
राज्यात लॉकडाऊन लावण्याआधी रुग्णांची संख्या सात लाखांपर्यंत पोहचली होती. मात्र लॉकडाउननंतर ही संख्या चार लाख 75 हजारापर्यंत खाली आली. देशाचा रुग्णवाढीचा दर 1.4 आहे, तर राज्यात तो 0.8 पर्यंत आहे. देशातील 36 राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचा याबाबत 30 वा क्रमांक आहे. त्यामुळे निर्बंधांचे सकारात्मक परिणाम दिसून आल्याने मंत्रिमंडळाच्या बैठकीत बहुतांश मंत्र्यांनी निर्बंध अधिक वाढवावेत, अशी विनंती केली होती. अखेर, राज्य सरकारने आज याबाबत निर्णय घेतला असून 1 जून सकाळी 7 वाजेपर्यंत निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत.
नवे निर्बंध :
- परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्यांसाठी निगेटिव्ह अहवाल आवश्यक
- एअरपोर्ट, बंदरावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मेट्रो, मोनो, लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली.
- माल वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये चालकासह फक्त क्लीनरलाच प्रवासाची मुभा.
- एपीएमसी बाजारपेठांसंदर्भात निर्बंध लागू करण्याचा स्थानिक प्रशासनाला अधिकार
दूध वाहतुकीसाठी कोणत्याही प्रकारचे निर्बंध असणार नाहीत.