सरकारकडून किमान प्रवासभाडय़ात 13-16 टक्क्यांची वाढ – 3 तासांच्या प्रवासावर 1100 रुपयांपेक्षा अधिक खर्च
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
केंद्र सरकारने देशांतर्गत विमान प्रवास करणाऱयांना मोठा झटका दिला आहे. सरकारने किमान प्रवासभाडय़ात 13 ते 16 टक्क्यांची वाढ केली आहे. पण कमाल प्रवासभाडय़ात कुठलाच बदल करण्यात आलेला नाही. नागरी विमानोड्डाण मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. नवे प्रवासभाडे 1 जूनपासून लागू होणार आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेमुळे देशात विमानप्रवास रोखावा लागला होता. काही काळानंतर सरकारने विमानप्रवासाला मंजुरी दिली होती. पण पूर्ण क्षमतेसह उड्डाण करण्याची अनुमती नव्हती. तसेच सरकारने किमान आणि कमाल तिकीटदरांवर मर्यादा घातली होती. यामुळे एअरलाइन्सवरील आर्थिक भार वाढत होता. कोरोनाच्या दुसऱया लाटेमुळे हवाई प्रवास करणाऱयांच्या संख्येत घट झाली आहे. यामुळे एअरलाइन्स कंपन्यांवरील भार अधिकच वाढला आहे. अशा स्थितीत किमान तिकीट दर वाढल्याने एअरलाइन्सना मदत मिळू शकते.
40 मिनिटांच्या प्रवासासाठी किमान 2,600 रुपये खर्च करावे लागणार आहेत. आतापर्यंत 40 मिनिटांच्या प्रवासासाठी किमान प्रवासभाडे 2,300 रुपये होते. अशाचप्रकारे कालावधीनुसार किमान प्रवासभाडय़ात वाढ करण्यात आली आहे. सर्वाधिक लांबीच्या 180 ते 210 मिनिटांपर्यंतच्या प्रवासासाठी किमान प्रवासभाडय़ात 1100 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 180 मिनिटांहून अधिक वेळेच्या प्रवासासाठी प्रवाशांना आता किमान 7600 रुपयांऐवजी 8700 रुपये खर्च करावे लागणार आहेत.