मध्यवर्तीच्या 25 रोजीच्या बेळगाव मोर्चाला पाठिंबा
वार्ताहर/खानापूर
बेळगाव मनपावरील लाल-पिवळा ध्वज हटवा, मराठी कागदपत्रे द्या या मागणीसाठी तसेच व सीमाभागात मराठी भाषिकांवर होणाऱया कन्नड सक्तीविरोधात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने 25 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वा. जिल्हाधिरी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चाला खानापूर तालुका म. ए. समितीच्यावतीने संपूर्ण पाठिंबा देण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष देवाप्पा गुरव होते.
प्रारंभी सचिव गोपाळराव देसाई यांनी स्वागत करून 25 रोजी बेळगाव येथे होणाऱया मोर्चाला पाठिंबा देणे व खानापुरात 1 नोव्हेंबर रोजी काळा दिन गांभीर्याने पाळण्याचा विषय मांडला. चर्चेत दि. 25 रोजी सकाळी 10 वाजता बेळगाव धर्मवीर संभाजी चौकातून सुरू होणाऱया या मोर्चाला खानापुरातून अधिकाधिक मराठी भाषिकांनी उपस्थित राहून पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्वांनी वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहनही करण्यात आले. 1 नोव्हेंबर काळादिन खानापुरात गांभीर्याने पाळण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. त्या दिवशी सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यंत लक्ष्मी मंदिरमध्ये लाक्षणिक उपोषण व सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. यासंदर्भात जागृती पत्रके वाटप करून काळा दिन गांभीर्याने पाळण्याबाबत जागृती अभियान हाती घेण्याचा ठराव करण्यात आला.
बैठकीला समितीचे कार्याध्यक्ष मारुती परमेकर, मध्यवर्ती कार्यकारिणी सदस्य गोपाळ पाटील, ता. पं. माजी सदस्य पांडुरंग सावंत, पी. एच. पाटील, विनायक सावंत, रणजीत पाटील, रविंद्र पाटील, अजित पाटील, राजू पाटील, दत्तू कुटे, कृष्णा कुंभार आदी उपस्थित होते.