वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील संघटित क्षेत्रामध्ये 2021-22 मध्ये 1.46 कोटी जणांना नोकरी प्राप्त झाली आहे. एक वर्षआधी 94.7 लाख लोकांना नोकरी मिळाली होती. म्हणजेच यावषी यामध्ये 45 लाखांची भर पडली आहे. यातील 1.38 कोटी लोक कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना व 6.8 लाख राष्ट्रीय पेन्शन योजना अंतर्गत जोडलेले आहेत. एसबीआय यांनी या संदर्भात केलेल्या पाहणीमध्ये वरील माहिती देण्यात आली आहे.
1.38 कोटींपैकी 60 लाख लोकांनी नोकरी बदलल्याची बाबही अहवालामध्ये स्पष्ट झाली असून 67 लाख लोकांना प्रथमच नोकरी प्राप्त झाली आहे. यावरून परिस्थितीत सुधारणा होत असल्याचे स्पष्ट होत असून नोकरी व रोजगार उपलब्ध होत आहेत. एसबीआयने 2 हजार सूचीबद्ध कंपन्यांची पाहणी केली आहे. 100 ते 250 कोटी रुपयांचा व्यवसाय करणाऱया कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱयांवरती 22 टक्के खर्च केल्याचे अहवालात दिसून आले आहे.
बचतीवर अनेकांचा भर
अलीकडच्या काळामध्ये कोरोनामुळे झालेली अनिश्चितता लक्षात घेऊन लोकांनी बचत करण्यावर अधिकचा भर दिला आहे. 2021-22 वर्षात लोकांनी 6.91 लाख कोटी रुपये बचत केली आहे. 3.4 लाख कोटी हे जमा खात्यामध्ये, 1.91 लाख कोटी पीएफ, विमा व अन्यत्र जमा करण्यात आले आहेत.
दरम्यान, 2021-22 आर्थिक वर्षात राष्ट्रीय पेन्शन योजनेत (एएनपीएस) 7.76 लाख नवे सदस्य जोडले गेले आहेत. यात राज्य सरकारचा वाटा 4.95 लाख आणि बिगरसरकारी क्षेत्राचा वाटा 1.47 लाख आहे.