वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
वेगवान इंटरनेट सेवा प्राप्त करुन देण्यासाठी आता दूरसंचार क्षेत्रात 5-जी नेटवर्क सुरु करण्यासाठीच्या प्रक्रियेसाठी स्पेक्ट्रमचा लिलाव होत आहे. मागील चार दिवसांपासून भारतामध्ये या स्पेक्ट्रमसाठी लिलाव सुरु आहेत. यामध्ये विविध कंपन्यांकडून लावण्यात येणाऱया बोलीमधून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे 16 व्या फेरी दरम्यान एकूण 1,49,623 कोटी रुपयांची बोली प्राप्त झाली आहे. चौथा दिवशी शुक्रवारीही लिलाव प्रक्रिया सुरु होती.
मुख्य टक्कर कोणाकोणाची
उत्तर प्रदेशातील ईस्ट सर्कलमध्ये 1,800 मेगाहर्ट्ज बँडच्या स्पेक्ट्रममध्ये जिओ व एअरटेल यांची पसंती असल्याचे दिसून येत आहे. तसेच बुधवार व गुरुवारी त्यांची अटीतटीची टक्कर झाली आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांची रिलायन्स जिओ, सुनील भारती मित्तल यांची भारती एअरटेल व गौतम अदानी यांच्या कंपनीसोबत व्होडाफोन आयडिया यांचाही प्रवास 5-जी स्पेक्ट्रमध्ये सुसाट होणार असल्याचे संकेत आहेत.
पहिल्या दिवसांपासून बोलीमध्ये रंगत
बोलीच्या पहिल्या दिवशी मंगळवारी चार फेऱयांचा लिलाव झाला असून यामध्ये 1.45 लाख कोटी रुपयांची बोली लावण्यात आली होती. तसेच बुधवार व गुरुवार या दिवशी रेडिओ तरंगांची अतिरिक्त मागणी आली आहे. शुक्रवारी 17 व्या फेरीसाठी बोली सुरु झाली होती. तर गुरुवारी एकूण 1,49,623 कोटी रुपयांची बोली प्राप्त झाली आहे.
. कमीत कमी कितीची बोली ः
बोलीच्या अंतर्गत कमीत कमी 4.3 लाख कोटी रुपये मूल्याच्या एकूण 72 गीगाहर्ट्ज रेडिओ तरंगाचा समावेश होता. लिलावामध्ये 600 मेगाहर्ट्ज, 700 मेगाहर्ट्ज, 800 मेगाहर्ट्ज, 900 मेगाहर्ट्ज, 1,800 मेगाहर्ट्ज, 2,100 मेगाहर्ट्ज, 2,300 मेगाहर्ट्ज आणि उच्च 26 गीगाहर्ट्ज आवृत्ती बँडमध्ये स्पेक्ट्रमसाठी बोली आयोजित करण्यात आली आहे.