दिल्लीजवळील ग्रेटर नोयडा येथे एक अनिवासी भारतीय दांपत्य 1 कोटी रुपयांचे दागिने असलेली बॅग उबेरच्या कॅबमध्ये विसरून कॅबमधून उतरून निघून गेले. जवळजवळ दोन तासांनी त्यांच्या लक्षात ही बाब आली. त्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आणि पोलिसांनी पुढच्या अवघ्या चार तासात कॅबचा शोध घेऊन दागिन्यांनी भरलेली बॅग परत मिळविली. आपल्या मुलीच्या साखरपुडय़ासाठी हे दांपत्य भारतात लंडनहून आलेले होते.
निखिलेश कुमार सिन्हा हे आपल्या मुलीच्या लग्नासाठी पत्नीसह भारतात आलेले होते. गेल्या बुधवारी ग्रेटर नोयडा येथील एका आलीशान हॉटेलमध्ये त्यांच्या मुलीचा साखरपुडय़ाचा कार्यक्रम होता. गुरुग्राम येथून उबेरच्या टॅक्सीने ते हॉटेलात पोहोचले. पण बॅग टॅक्सीतच विसरले. पोलिसांनी कॅबच्या लाईव्ह लोकेशनला ट्रक करून गाडी शोधून काढली. तोपर्यंत ती गाझियाबाद येथे पोहोचली होती. निखिलेश यांना हॉटेलपर्यंत पोहोचविल्यानंतर या गाडीने अनेक राईड्स पुऱया केलेल्या होत्या. ड्रायव्हरला दागिन्याच्या बॅगबद्दल काहीच माहिती नव्हती. गाडी शोधल्यानंतर पोलिसांनी डिक्कीतून बॅग ताब्यात घेतली आणि निखिलेश यांना सोपविली. पोलिसांच्या या वेगवान कारवाईबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे. व्हेईकल ट्रकिंग सिस्टीमचा उपयोग किती चांगल्या प्रकारे केला जाऊ शकतो, याचे प्रत्यंतर या घटनेतून येत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग अशाप्रकारे आपल्या सुरक्षेसाठी केला जाऊ शकतो, ही समाधान देणारी बाब आहे.