गुवाहाटी / वृत्तसंस्था
आसाम राज्याच्या हायलाकांडी जिल्हय़ात मोठय़ा संख्येने असणारे ब्रू अतिरेकी आता सरकारला शरण येण्याच्या तयारीत आहेत असे दिसून येत आहे. 12 डिसेंबरला 1 हजारांहून अधिक अतिरेकी शरण येतील. त्यांनी आता हिंसेचा त्याग केला असून शस्त्रे टाकून देण्याची तयारी त्यांनी दर्शविली आहे.
शस्त्रांच्या त्याग करुन समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याचे संकेत त्यांनी काही दिवसांपर्वीच दिले होते. ही माहिती हाईलाकांडीचे पोलीस महानिरीक्षक विद्युत दास यांनी या शरणागतीविषयी अधिक माहिती दिली. या माहितीनुसार युनायटेड डेमॉपेटिक लिबरेशन आर्मी ऑफ बराक व्हॅली (युडीएलबीव्ही) आणि ब्रू रिव्होल्युशनरी आर्मी ऑफ युनियन (बीआययू) या संघटनांचे सदस्य अधिकृतरित्या मिझोरामच्या सीमेनजीक असणाऱया काटलीचेरा येथे प्रशासनासमोर शरण येणार आहेत.
ब्रू अतिरेकी आणि त्यांचे कुटुंबीय म्यानमारमध्ये वास्तव्यास आहेत. त्यांना भारतात परतणे शक्य व्हावे म्हणून 2018 मध्येच एक करार करण्यात आला होता. या समझोता करारानंतर या अतिरेक्यांना देशात परतण्याचे आवाहन करण्यात आले. त्यांच्याशी यशस्वी वाटाघाटी करण्यात आल्या. आता त्यांच्या शरणागतीचा मार्ग मोकळा झाला आहे. सारे काही व्यवस्थित झाल्यास आसाम आणि मिझोरामसमोरची आणखी एक समस्या मिटण्याची शक्यता आहे.