स्वतःच्या सरकारला गडकरींचा सल्ला -गरज पूर्ण झाल्यावर निर्यातही करा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
लसींच्या तुटवडय़ावरून केंद्रीय रस्तेवाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी स्वतःच्या सरकारलाच सल्ला दिला आहे. सरकारने एकाऐवजी 10 कंपन्यांना लस निर्मितीची परवानगी द्यावी असे गडकरींनी विद्यापीठाच्या कुलगुरुंशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधताना म्हटले आहे.
पुरवठय़ापेक्षा लसीची मागणी अधिक राहिल्यास अडचणी येणारच. एका कंपनीऐवजी सरकारने 10 कंपन्यांना लस निर्मितीची मंजुरी द्यावी. या कंपन्यांना देशात पुरवठा करू द्यावा आणि गरजेपेक्षा अधिक पुरवठा झाल्यास या कंपन्यांनी विदेशात निर्यात करावी. हे काम 10-15 दिवसांमध्ये केले जावे असे गडकरींनी म्हटले आहे.
खते आणि रसायन मंत्री मनसुख मांडविया यांनी यापूर्वीच लसीचे उत्पादन वाढविण्यावरून सरकारच्या प्रयत्नांविषयी माहिती दिली आहे. सरकार 12 विविध प्रकल्प आणि कंपन्यांमध्ये लस तयार करत आहे. सरकार योग्य दिशेने काम करत असल्याचे गडकरींनी स्वतःच्या विधानावर स्पष्टीकरण देत म्हटले आहे.
भारताला सध्या औषधांसाठी कच्चा माल विदेशातून मागवावा लागतो. आम्ही आत्मनिर्भर भारत निर्माण करू इच्छितो. भारतातील सर्व जिल्हे वैद्यकीय ऑक्सिजनप्रकरणी आत्मनिर्भर व्हायला हवेत. देशाचे आरोग्य क्षेत्र सध्या मोठय़ा संकटातून जात आहे. महामारीच्या काळात आम्हाला सकारात्मक राहून मनोबळ वाढवावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
काँग्रेसची उपरोधिक टिप्पणी
गडकरींच्या सल्ल्यावर काँग्रेसने उपरोधिक टिप्पणी केली आहे. गडकरींचे बॉस त्यांचं म्हणणं ऐकत आहेत का असे काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी म्हटले आहे. 8 एप्रिल रोजी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनीही अशाचप्रकारची सूचना केली होती. यापूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही यासंबंधी पंतप्रधानांना पत्र लिहिले होते. केंद्राने लस निर्माण करणाऱया दोन्ही कंपन्यांचा फॉर्म्युला अन्य औषध कंपन्यांना उपलब्ध करुन लसीचे उत्पादन वाढवावे असे त्यांनी म्हटले होते.