प्रतिनिधी/ बेळगाव
लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर बेळगावमधील हजारो कामगार आपल्या गावी परतले होते. लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यानंतर उद्योग, बांधकाम क्षेत्रातील कामांना गती मिळाली आहे. परंतु या क्षेत्रांना कुशल कामगारांची गरज जाणवत होती. आता हळूहळू कामगार पुन्हा कामावर परतू लागले आहेत. एकूण 10 हजार 462 कामगार पुन्हा कामावर परतले असून कामांची गती वाढल्याने कामगारांमधून समाधान व्यक्त होत आहे.
बेळगावमध्ये कर्नाटकाबरोबरच महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, बिहार, राजस्थान, गुजरात, आसाम येथील हजारो कामगार काम करतात. बांधकाम व औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱया कामगारांची संख्या सर्वांधिक आहे. लॉकडाऊन झाल्यानंतर सर्वच उद्योग बंद झाल्याने बस, रेल्वेने हे सर्व कामगार गावी परतले. स्पेशल श्रमिक रेल्वेने कामगारांना त्यांच्या गावापर्यंत पाठविण्यात आले. परंतु यामुळे उद्योग सुरू होवूनही कामगार नसल्याने अनेक समस्या उद्भवत होत्या. सध्या आसपासच्या जिल्हय़ांमधील कामगार पुन्हा परतले असून कामाला सुरूवात झाली आहे.
मोबाईल ऍपद्वारे नोंदणी
कामगारांची माहिती गोळा करण्याचे काम सध्या सुरू आहे. यामध्ये बांधकाम कामगार, औद्योगिक वसाहत व इतर उद्योगांमध्ये असणाऱया कामगारांचे वर्गीकरण करण्यात येणार आहे. येत्या काही दिवसांमध्ये या ऍपचे काम पूर्ण होणार असून कामगारांची संपूर्ण माहिती मिळणार आहे. इतर राज्यांमध्ये गेलेल्या कुशल कामगारांना पुन्हा कामावर रूजू होण्यासाठी उद्योग विनीमय केंद्रातर्फे प्रयत्न केले जात आहेत.
लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यानंतर 4 मे पासून बेळगावमध्ये औद्योगिक कंपन्या सुरू करण्यात आल्या. परंतु कुशल कामगारांची वाणवा जाणवत होती. सध्या जिल्हय़ात 10 हजार 462 कामगार पुन्हा परतले आहेत. या कामगारांची माहिती ऍपद्वारे घेण्यात येत असल्याचे जिल्हा औद्योगिक केंद्राचे सहसंचालक दोड्डबसवराजू यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.