लवकरच भूखंडांचे खरेदीपत्र करणार : प्रशासकीय मंजुरीनंतर ई-लिलावाद्वारे 38 भूखंडांच्या विक्रीसाठी बोली
बेळगाव : माळमारुती परिसरात महापालिकेच्यावतीने भूखंड घालण्यात आले होते. यापैकी शिल्लक असलेल्या 38 भूखंडाच्या विक्रीसाठी लिलाव प्रक्रिया राबविली होती. या अंतर्गत पात्र असलेल्या गाळेधारकांना रक्कम भरण्यासाठी मनपाने नोटीस बजावली होती. या माध्यमातून महापालिकेच्या खात्यावर 10 कोटी जमा होणार आहेत. लवकरच या भूखंडांचे खरेदीपत्र केले जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. महापालिकेने भू-संपादन करून वसाहत निर्माण केली होती. यापैकी काही भूखंड राखीव ठेवले होते. मात्र अलिकडे काही भूखंडांवर अतिक्रमण होत असल्याचे निदर्शनास आले होते. या भूखंडांची हद्द बदलण्याचा प्रकारही काहींनी केला होता. काही ठिकाणी अतिक्रमण करून भूखंडांची विक्री केल्याचेही महापालिकेच्या निदर्शनास आले होते. त्याकरिता मनपाला न्यायालयात धाव घेण्याची वेळ आली होती. या सर्व प्रकारामुळे महापालिकेने सदर भूखंड विक्री करण्याचा निर्णय घेतला होता. मागील वर्षीच्या अर्थसंकल्पात भूखंड विक्रीचा समावेश करण्यात आला होता. त्यानुसार प्रशासकीय मंजुरीनंतर ई-लिलावाद्वारे 38 भूखंडांच्या विक्रीसाठी बोली लावण्यात आली होती. यापैकी 37 भूखंडांना बोली लागली होती. सर्व भूखंडांच्या माध्यमातून महापालिकेला 10 कोटी महसूल मिळणार आहे. सदर भूखंडांच्या ई-लिलावात पात्र ठरलेल्या नागरिकांची यादी प्रसिद्ध करून जागेची रक्कम भरण्याची सूचना केली होती. याकरिता 1 महिन्याची मुदत मनपाने दिली होती. त्यानुसार भुखंडधारकांनी ही रक्कम महापालिकेकडे जमा केली आहे.
रक्कम जमा झाल्यानंतरच खरेदीपत्र देणार
सदर रक्कम जमा झाल्यानंतर महापालिकेकडून खरेदीपत्र करून दिले जाणार आहे. मात्र काहींनी ही रक्कम भरणा केली नसल्याने करारपत्र करण्यात आले नाही. बहुतांश भूखंडधारकांनी महापालिकेच्या खात्यावर भूखंडांची रक्कम जमा केली आहे. त्यामुळे लवकरच करारपत्र करून भूखंडांचा ताबा भूखंडधारकांना दिला जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.