पंतप्रधान नरेंद्र मोदींचा केंद्रीय विभागांना भरतीचा निर्देश ः मिशन मोडमध्ये पार पडणार भरती प्रक्रिया
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
शासकीय नोकऱयांच्या आघाडीवर केंद्रातील मोदी सरकारने देशातील तरुणाईला मोठी खूशखबर दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रीय मंत्रालये अन् विभागांना पुढील 18 महिन्यांमध्ये 10 लाख कर्मचाऱयांची भरती करण्याचा निर्देश दिला आहे. देशातील बेरोजगारीचा मुद्दा विरोधी पक्ष सातत्याने उपस्थित करत असताना ही घोषणा झाली आहे. पंतप्रधानांनी सर्व विभाग आणि मंत्रालयांमधील मनुष्यबळाच्या स्थितीचा आढावा घेत पुढील दीड वर्षांमध्ये मिशन मोडमध्ये 10 लाख कर्मचाऱयांची भरती करण्याचा निर्देश दिला असल्याची माहिती पीएमओने ट्विट करत मंगळवारी दिली आहे.
1 मार्च 2020 पर्यंत केंद सरकारच्या विविध विभागांमध्ये 8.72 लाख पदे रिक्त असल्याची माहिती केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी संसदेत दिली होती. केंद्र सरकारने स्वतःच्या विविध विभागांमध्ये 40 लाखांहून अधिक पदांना स्वीकृती दिली आहे, परंतु सध्या 32 लाखांपेक्षा कमी कर्मचारी कार्यरत आहेत. सरकार अनेक वर्षांपासून ही रिक्त पदे भरण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वाधिक रिक्त पदे मोठी मंत्रालये आणि विभाग म्हणजेच पोस्ट, संरक्षण, रेल्वे आणि महसूल विभागात आहेत.
डिसेंबर 2023 ची कालमर्यादा
केंद्र सरकारने ही 10 लाख कर्मचाऱयांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी डिसेंबर 2023 ही तारीख निश्चित केली आहे. रेल्वेत सुमारे 15 लाख स्वीकृतीप्राप्त पदांच्या तुलनेत सुमारे 2.3 लाख रिक्त पदे आहेत. संरक्षण विभागात सुमारे 6.33 लाख स्वीकृतीप्राप्त कर्मचाऱयांच्या तुलनेत 2.5 लाख पदे रिक्त आहेत. पोस्ट विभागात 90 हजार पदे रिक्त आहेत. तर महसूल विभागात 74 हजार पदे रिक्त आहेत. गृह मंत्रालयात सुमारे 1.3 लाख पदे रिक्त असल्याचे समोर आले आहे.
कोरोना महामारीमुळे मंदावली प्रक्रिया
कर्मचाऱयांच्या मोठय़ा कमतरतेमुळे काही विभागांचे कामकाज प्रभावित होत आहे. कोरोना महामारीमुळे नव्या भरतीची प्रक्रिया मंदावली आहे. याचबरोबर मंत्रालयांमध्ये कर्मचाऱयांची स्वीकृतीप्राप्त संख्या देखील मागील काही वर्षांमध्ये वाढली आहे. नव्या भरती प्रक्रियेमुळे बेरोजगारीच्या आघाडीवर सरकारवरील टीकेचा भडिमार कमी होणार असल्याचे एका अधिकाऱयाने म्हटले आहे.
काँग्रेसकडून टीका
10 लाख कर्मचाऱयांच्या भरतीच्या घोषणेवर काँग्रेसने उपरोधिक टीका केली आहे. हा प्रकार म्हणजे ‘ 900 चूहे खाकर बिल्ली हज को चली’ आहे. आम्ही 50 वर्षांमधील सर्वात खराब रोजगाराचा दर अनुभवत आहोत. रुपयाचे मूल्य 75 वर्षांमधील नीचांकी स्तरावर पोहोचले आहे. कधीपर्यंत पंतप्रधान ‘ट्विटर ट्विटर’ खेळून आमचे लक्ष भटकविणार आहेत अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केली आहे.
वेगाने पावले उचलावी लागतील
बेरोजगार तरुण-तरुणींचे दुःख जाणून घेतल्याप्रकरणी पंतप्रधानांचे आभार. नव्या रोजगाराच्या निर्मितीसह आम्हाला 1 कोटीहून अधिक ‘स्वीकृतीप्राप्त परंतु रिक्त’ पदांवर भरतीसाठी सार्थक प्रयत्न करावे लागतील. दरवर्षी 2 कोटी रोजगार देण्याचा संकल्प पूर्ण करण्यासाठी आणखीन वेगाने पावले उचलावी लागतील, अशी प्रतिक्रिया भाजप खासदार वरुण गांधी यांनी व्यक्त केली आहे.
पंतप्रधानांचे आभार ः शाह
नव्या भारताचा आधार त्याची युवा शक्ती आहे. युवा शक्ती सशक्त करण्यासाठी पंतप्रधान मोदी निरंतर कार्यरत आहेत. मोदींनी सर्व केंद्रीय विभागांमध्ये दीड वर्षांत 10 लाख कर्मचाऱयांची भरती करण्याचा निर्देश दिल्याने त्यांचे आभार मानतो, असे उद्गार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काढले आहेत.
प्रतिक्रिया
पंतप्रधान मोदींनी मागील काही वर्षांमध्ये सरकारला अधिक उत्तरदायी अन् शासनाला जनकेंद्रीत केले आहे. आत्मनिर्भर भारताच्या दिशेने लक्ष्य आणि संधींची पूर्तता करण्यासाठी सरकारची शक्ती वाढविण्यासाठी हे एक मोठे पाऊल आहे.
अनुराग ठाकूर, केंद्रीय मंत्री
दीड वर्षांमध्ये 10 लाख रोजगार, तरुणाईसाठी रोजगाराची संधी वाढविण्याचे प्रशंसनीय पाऊल आहे.
स्मृती इराणी, केंद्रीय मंत्री