मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख तर जखमींना 2.5 लाख रुपये मिळणार : रेल्वे बोर्डाचा निर्णय
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
रेल्वे बोर्डाने रेल्वे दुर्घटनेशी निगडित मदतनिधीत 10 पट वाढ केली आहे. याच्या अंतर्गत रेल्वे दुर्घटनेत एखाद्याचा मृत्यू झाल्यास संबंधितांच्या कुटुंबीयांना दिली जाणारी सहाय्य रक्कम 50 हजार रुपयांवरून वाढवत 5 लाख रुपये करण्यात आली आहे. तर गंभीर जखमीला 25 हजार रुपयांऐवजी 2.5 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. तर किरकोळ जखमी झाल्याच्या स्थितीत 5 हजार ते 50 हजार रुपयांची मदत केली जाणार आहे. मदतनिधीसोबत दुर्घटनेनंतर प्रवाशांच्या उपचाराचा खर्च देखील रेल्वे विभाग उचलणार आहे. रुग्णालयात 30 दिवसांहून अधिक भरती राहिलेला रुग्णाची दुखापत पाहून त्या आधारावर प्रतिदिन 3 हजार, 1 हजार पाचशे आणि 750 रुपयांचा खर्च मिळणार आहे. रेल्वे बोर्डाने एक परिपत्रक जारी करत मदतनिधीतील वृद्धीची माहिती दिली आहे. भरपाईचा नवा नियम लागू झाला आहे. यापूर्वी 2012-13 मध्ये भरपाईशी संबंधित रक्कम वाढविण्यात आली होती.
रेल्वे क्रॉसिंगवरील दुर्घटनेच्या स्थितीत..
परिपत्रकानुसार रस्त्यावरून चालणारे लोक रेल्वे विभागाच्या चुकीमुळे मानवरहित रेल्वे क्रॉसिंग गेट दुर्घटनेचे शिकार ठरल्यास त्यांनाही मदतनिधी मिळणार आहे. रेल्वे दुर्घटनांमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांचे कुटुंबीय आणि मॅन्ड लेव्हल क्रॉसिंगमध्ये जीव गमावणाऱ्या लोकांच्या कुटुंबीयांना आता 5 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. तर गंभीर जखमींना 2.5 लाख रुपयांची मदत केली जाईल. किरकोळ ईजा झाल्यास संबंधिताला 50 हजार रुपयांचे सहाय्य केले जाणार आहे.
दहशतवादी हल्ल्याचाही उल्लेख
रेल्वे प्रवासादरम्यान दहशतवादी हल्ला, हिंसक हल्ला किंवा चोरीसारखा गुन्हा घडल्याने जीव गमवावा लागल्यास संबंधिताच्या कुटुंबीयांना 1.5 लाख रुपयांची मदत केली जाणार आहे. तर अशाप्रकारच्या घटनांमध्ये गंभीर जखमी झाल्यास 50 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे.
…तर प्रतिदिन 3 हजार रुपये मिळणार
परिपत्रकानुसार रेल्वे दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांना 30 दिवसांहून अधिक काळ रुग्णालयात भरती राहिल्यावर प्रतिदिन 3 हजार रुपयांची मदत डिस्चार्ज मिळेपर्यंत केली जाणार आहे.
‘या’ प्रकरणांमध्ये मिळणार नाही भरपाई
अनमॅन्ड लेव्हल क्रॉसिंगवर दुर्घटनेचा शिकार ठरलेले लोक, विनाअनुमती प्रवेश करणारे लोक, तसेच रेल्वेवरील तारांना स्पर्श झाल्याने मृत्यमुखी पडलेल्या लोकांना कुठल्याही प्रकारची भरपाई दिली जाणार नसल्याचे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.