कोणत्याही राजघराण्याचा वारसा नसलेले नाव नुकतेच ब्रिटिश राजघराण्यात मानाने समोर आले. ज्या भारतावर ब्रिटिशांनी दीडशे वर्ष राज्य केलं त्याच देशाचे वंशज असलेले भारतीय दांपत्य ब्रिटिश सत्तेच्या सर्वोच्च पदावर विराजमान होत होते.
ब्रिटनच्या पंतप्रधानपदी ऋषी सुनक नावाची घोषणा झाली आणि भारतामध्ये चर्चेला उधाण आले. अगदी उलट सुलट चर्चा सुरू झाली. काहींच्या मते त्यांचे पूर्वज केव्हाच भारत सोडून गेले होते त्यामुळे त्यांचा भारताशी काहीही संबंध नाही. भारतीय लोकांना उगीचच मोठेपणा घ्यायची सवय लागली आहे. असाही एक सूर ऐकायला मिळाला. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही घोषणा होणं म्हणजे भारतीयांना मिळालेली एक सुंदर भेटच. खरंतर काही दिवसांपूर्वीच ब्रिटनच्या राणीची मृत्यूमुळे कारकीर्द संपली, नियमानुसार राजाला राज्याभिषेकही होईल. पण त्यानंतर ब्रिटनची धुरा नेमकी कुणाच्या खांद्यावर जाईल याची कल्पना नव्हती. अर्थातच ट्रस नावाच्या बाईंनी ही धुरा पेलली पण जेमतेम 45 दिवस. पण खऱया अर्थाने आता ती पेलणार आहेत एशियन म्हटले जाणारे किंवा भारतीय वंशाचे ऋषी सुनक काहींच्या मते सुनक कुटुंबीय पाकिस्तानच्या गुजरावाल गावातले, त्यानंतर आफ्रिकेतील नैरोबी, केनिया, टांझानिया आणि शेवटी इंग्लंड येथेच ते लोक स्थिरावले पण इंग्लंडने त्यांना मात्र एशियन म्हणूनच स्वीकारलं. आजही ब्रिटनमध्ये कोणतेही सर्वोच्च पद ब्रिटनबाहेरच्या व्यक्तीला दिले जात नाही. अगदी डॉक्टर असो किंवा वकील असो किंवा कोणीही असो. ऋषी सुनक जन्माने जरी ब्रिटिश असले तरी भारतीय वंशाचे किंवा आशियाई वंशाचे असंच त्यांना मानलं गेलं. याचं कारण म्हणजे आपल्या भारताप्रमाणे ब्रिटनलाही वर्णभेद, वंशभेद ही सगळी वरदानं आहेतच आणि त्याचे अनुभव आजही लोकांना येतात. अनेक लोक त्यात भरडले जातात. म्हणूनच अशा या भारतीय वंशाच्या माणसाला ब्रिटनचा पंतप्रधान होण्याचा मान मिळणं हे आपल्यासाठी खूप अभिमानास्पद आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची पत्नी जी नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांची कन्या आहे तिचं भारतीयत्व निर्विवाद आहेच. या मुलीची म्हणजेच मूर्तींची संपत्ती ही क्वीन एलिझाबेथपेक्षा खूप मोठी आहे असेही 2022 च्या संडे टाईमच्या रीच लिस्टने लिहिले होते. इतक्मया स्थलांतरानंतर हे कुटुंब ब्रिटनमध्ये स्थिर झाल्यानंतर आपण हिंदू संस्कृतीचेच पाईक आहोत हे आवर्जून सांगतात आणि शपथग्रहणाच्या वेळेला भगवत गीतेवर हात ठेवून शपथ घेतात. गाईची पूजा करतात, असा माणूस हिंदू संस्कृतीशी नाळ जोडून आहे याचा सार्थ अभिमान वाटतो. हे सगळं वाचत असताना आणि लिहीत असताना माझं मन 19 व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात गेलं. 1930 साली सावरकरांनी लिहिलेली कविता सहज आठवली. ब्रिटिशांच्या विरुद्ध बंड चालू असतानाच, क्रांती चालू असताना लोकांच्या मनात स्वदेशी प्रेम जागृत करण्याचं काम ते नेटाने करत होते. त्यावेळेला आलेली दिवाळी आणि आत्ताची दिवाळी या दोन्हीचा कुठेतरी मनात तुलनात्मक अभ्यासही झाला. लक्ष्मी मिळणं आणि त्याचा योग्य वापर करणे म्हणजे आपल्या आयुष्याचे सर्व घटक योग्य रीतीने वापरणे असाच अर्थ त्यातून निघतो. जी आमच्यावरती राज्य करून धाकधपटशा दाखवून, तिच्या जोरावर बोटीतून गेली होती ती लक्ष्मी पुन्हा मानसन्मानाने संसदीय मार्गाने एखाद्या ऋषीतुल्य माणसाच्या हातात परत यावी हा केवढा मोठा योग.