एकीकडे 100 कोटी लसीचे ढोल वाजवले जात असून दुसरीकडे 100 रुपयांवर पेट्रोलने पोहचून महागाईत आग ओकली आहे.
गेल्या आठवडय़ात देशाने कोविड महामारीविरुद्धच्या लढाईत एक महत्वाचा टप्पा गाठला. 100 कोटी लसी देण्याचा विक्रम केला म्हणून लागलीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साऱया राष्ट्राला संबोधून भाषण करून आपल्या सरकारची पाठ थोपटण्याचे काम केले. पंधरा पेक्षा जास्त मिनिटे केलेल्या या संबोधनात आत्तापर्यंत कोणत्याच सरकारने एवढय़ा तत्परतेने आणि शास्त्रीय दृष्टय़ा अतिशय महत्वाचे असे लोकआरोग्याचे काम केले नव्हते अशापद्धतीने दावा केला. आपल्या सरकारने वेळीच सावध होऊन युद्धस्तरावर काम केल्यानेच हे युद्ध आपण आता जिंकत आलो आहोत. असा त्यांच्या भाषणाचा गोषवारा होता. खराब चाललेली अर्थव्यवस्था परत रुळावर येत चालली आहे आणि त्यामुळे सगळीकडे आबादी आबाद आहे. सारे काही आलबेल आहे. आपल्या नेतृत्वाखाली ही लढाई जिंकली गेली आहे असाच पंतप्रधानांचा संदेश होता.
प्रत्यक्षात स्थिती मात्र निराळी आहे. आठ महिन्यांपूर्वी भाजपनेच पंतप्रधानांनी महामारीचा पाडाव केला अशी सगळीकडे टिमकी वाजवली आणि पक्षाच्या बैठकीत त्यांच्या अभिनंदनाचा ठराव ही पास केला. त्यानंतर दुसरी लाट आली आणि त्यात लाखो लोकांचे बळी गेले. आपल्या देशात अधिकृतपणे साडेचार लाख लोक देवाघरी गेले तर अनधिकृत आकडा याच्या दसपट आहे असे दावे केले जात आहेत. सरकारी यंत्रणा याबाबत फारसे काही बोलत नाही. या लसीकरणाकरता 35,000 कोटीची तरतूद सरकारने अर्थ संकल्पात केली आणि ते उभे करण्यासाठी आत्तापर्यंत 23 ते 25 लाख कोटी रुपये पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीतून उकळले आहेत. गरीब आणि मध्यम वर्गाला याचा जबर फटका बसला आहे कारण महागाईच्या वडवानलात ते होरपळून निघत आहेत. देशात पहिल्यांदाच दुचाकी वाहन परवडत नाही म्हणून सायकलचा वापर निम्न मध्यम वर्गात वाढला आहे. वर्ल्ड हंगर इंडेक्समध्ये देखील भारताला मिळालेले 101 वे स्थान लाजिरवाणे आहे आणि भुकेमुळे देशात किती भयावह स्थिती झाली आहे हे दाखवत आहे. सरकारने हा इंडेक्स नीट बनवण्यात आला नाही असा दावा केला असला तरी जीन डेझ यांच्यासारख्या ख्यातनाम अर्थतज्ञाने सरकारचे वाभाडे काढले आहेत.
पंतप्रधान अथवा त्यांच्या कोणत्याही मंत्र्याने अजूनतरी पेट्रोल-डिझेलचे एव्हढे भाव का वाढत आहेत आणि महागाई का भडकली आहे याविषयी अजूनतरी यत्किंचितही भाष्य केलेले नाही. संबंधित खात्याचे मंत्री हरदीप पुरी हे मोघमपणे किमतीत स्थिरता आणण्याविषयी बोलतात पण पेट्रोल-डिझेलचे भाव कधी कमी होतील ते सांगत नाहीत.योगी आदित्यनाथ यांना हरवण्यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृह मंत्री अमित शहा हे पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी चूप बसले आहेत असे मुख्यमंत्र्यांचे काही खासमखास समर्थक सांगत आहेत. त्यात कितपत तथ्य आहे हे निकाल लागल्यावरच कळेल पण वाढती महागाई हा एक मोठा मुद्दा निवडणुकीत झाला आहे त्याचीच ही आडवळणाने कबुली होय. आठ वर्षांपूर्वी राजस्थानच्या निवडणुकात मतदान ज्या दिवशी होते त्या दिवशीच पेट्रोल-डिझेलची भाववाढ झाल्याने आपण हरलो असे त्यावेळीदेखील मुख्यमंत्री असलेले अशोक गेहलोत म्हणाले होते.
उत्तर प्रदेशः प्रियंकाच्या ’गुगली’ ने निवडणूक रंगणार
राजकारण फार झपाटय़ाने बदलत आहे. एखाद्या थरारक चित्रपटात पुढे काय होणार या भीतीने प्रेक्षक खुर्चीला खिळून बसतो. तशीच काहीशी अवस्था सामान्य माणसाची झाली आहे. राजकीय वारे कशा प्रकारे वाहत आहेत, बदलत आहेत, कि वादळच येऊ घातले आहे अशा अचानक बदलत्या हवेने भलेभले पुढे
घडणार तरी काय याबाबत विस्मय करत आहेत. चार-सहा महिन्यापूर्वी भाजप उत्तर प्रदेशात हमखास पुन्हा सत्तेवर येणार असे चित्र होते. आता भाजपचे नि÷ावंत देखील येती निवडणूक वाटत होती तितकी सोपी नाही असे प्रत्यक्ष/अप्रत्यक्षरीत्या सांगत आहेत. 100 कोटी लोकांचे लसीकरण झाले असे आता जोरदार ढोल बडवले जात असले तरी उत्तर प्रदेशातील काही भागातील खेडय़ांमध्ये किडा मुंगीसारखी माणसे मेली. साधा ताप यायचा आणि उपचाराच्या आतच माणसे मरावयाची अशा बऱयाच घटना घडल्याची वृत्ते आली. तात्पर्य काय तर कोविडची महामारीदेखील निवडणुकीतील एक मोठा विषय राहणार आहे. लसीकरण कार्यक्रमात सर्व राज्यात उत्तर प्रदेश हा मागे राहिला आहे असे जाणकार सांगत आहेत. अशावेळी योगी सरकारच्या राज्य कारभाराची श्रीशिल्लक काय? हा मोठा प्रश्न भाजपला सतावत आहे. अशातच प्रियंका गांधींनी काँग्रेस उत्तर प्रदेशच्या 403 जागांकरता तिकीटवाटप करताना 40 टक्के जागांवर महिला उमेदवार उतरवणार असे सांगून राजकीय वर्तुळात हलचल माजवली आहे. प्रियंका यांच्या या अनपेक्षित खेळीने जशी भाजप हादरली आहे तसे उत्तर प्रदेशातील प्रादेशिक पक्षदेखील. स्वतःला पुढील मुख्यमंत्री समजणारे समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांची प्रियंकाच्या या खेळीवर अजून साधे भाष्य आलेले नाही हे बोलके आहे. भाजपने डावललेले वरूण गांधी हे काँग्रेसमध्ये येणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. आपण मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करणार आहोत असे काँग्रेसने अगोदरच सांगितले आहे. सोनिया आणि मनेका या दोन जावांमध्ये विस्तवही जात नसला तरी एकमेकांच्या मुलांबाबत त्यांना फार प्रेम आहे असे सांगितले जाते, वरुण तर गांधी-नेहरू परिवारातील शेंडेफळ आणि त्याचे प्रियंका दीदीबरोबर लहानपणापासून फार गुळपीठ आहे असे राजकीय वर्तुळत बोलले जाते. निवडणुकीपूर्वी काँग्रेस अजून काही बार उडवणार आहे असे बोलले जाते. अमेरिकेएव्हढी 23 कोटी लोकसंख्या असलेले उत्तर प्रदेश हे अजब राज्य आहे. तेथील कारभारच उफराटा असल्याने त्याला ’उलटा प्रदेश’ असे देखील संबोधिले जाते. ’ठेविले अनंते तैसेचि राहावे, चित्ती असो द्यावे समाधान’ असा संत उपदेश उत्तर प्रदेशातील लोकांनी पाळला तरच भाजपला चार महिन्यावर आलेल्या विधानसभा निवडणुकीत विनासायास परत सत्ता मिळणार आहे. लोकांना भेडसावणारे सारे प्रश्न विसरले जावेत म्हणूनच येति निवडणूक ही राम भक्त आणि राम द्रोही यांच्यात आहे असे सांगून योगी हिंदुत्वाचा नारा परत एकदा बुलंद करत आहेत. हा शिळय़ा कढीला ऊत आणण्याचा प्रकार होणार कि हिंदुत्वाची मशाल परत एकदा प्रभावी ठरणार ते लवकरच दिसणार आहे.
सुनील गाताडे