जिल्हय़ात बाधीतांची संख्या 3 हजार नजीक , बरे होण्याचे प्रमाण 63 टक्क्यांवर
प्रतिनिधी/ रत्नागिरी
रविवार सायंकाळपासूनच्या 24 तासात जिल्हयात ऍन्टीजेन चाचणीत 57 तर आरटीपीसीआर चाचणीत 43 असे एकूण 100 नवे रुग्ण सापडले आहेत. यामुळे जिल्हयातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या तीन हजारांच्या टप्प्यानजीक पोहचली आहे. दरम्यान, आणखी तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून कोरोना बळींची एकूण संख्या 105 झाली आहे.
सोमवारी रत्नागिरीतील नाचणे येथील 72 वर्षीय कोरोना रुग्णाचा तसेच दापोली येथील 64 वर्षीय रुग्णाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. तसेच खेड तालुक्यातील कर्टेल येथील ऍन्टीजेन टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आलेल्या 68 वर्षीय रुग्णाचा 16 ऑगस्ट रोजी मृत्यू झाला असल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे.
रत्नागिरीत तब्बल 79 नवे रूग्ण
आरटीपीसीआर चाचणीमध्ये पॉझीटीव्ह आढळलेल्या 43 रूग्णांचे स्वॅब रत्नागिरीत घेण्यात आले होते. तर ऍन्टीजेन टेस्टमध्ये 36 रूग्ण रत्नागिरीत सपाडले आहेत. त्यामुळे रत्नागिरीत तालुक्यात तब्बल 79 नव्या रूग्णांची नेंद झाली. त्याचबरोबरोबर ऍन्टीजेन टेस्टमध्ये संगमेश्वर 7, गुहागर 2, देवरुख 2 व घरडा रुग्णालयातील चाचणीत 10 पॉझीटीव्ह रूग्ण आढळले आहेत. नव्या रूग्णांमध्ये पंचायत समिती सभापती, कर्मचारी, आरोग्य सेवक, पोलिस अधिकारी आदींचा समावेश आहे.
आणखी 31 जण बरे
सोमवारी कोरोनावरील उपचारानंतर बरे झालेल्या 31 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये जिल्हा शासकीय रुग्णालय येथून 3, कळबणी 2, समाजकल्याण रत्नागिरी 24, घरडा खेड 2 येथे उपचार घेत असताना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांचा संख्या आता 1847 झाली आहे.
केवळ 15अहवाल प्रलंबित
जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 22 हजार 271 नमुने तपासण्यात आले असून 2945 अहवाल पॉजिटीव्ह तर 19 हजार 299 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. केवळ 15 नमुन्यांचा अहवाल रत्नागिरी प्रयोगशाळेमध्ये प्रलंबित आहे. मुंबईसह इतर जिल्हयातून आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाईन केले जाते. आज अखेर होम क्वारंटाईन असणाऱयांची संख्या 45 हजार 195 आहे.
‘त्या’ व्हायरल मेसेजमुळे ग्राहकांची बाजारपेठेकडे पाठ
रत्नागिरी शहरातील मुख्य बाजारपेठेतील राम आळी, गोखले नाका परिसरातील व्यापाऱयांना कोरोना झाल्याबाबतच्या व्हायरल मेसेजमुळे ग्राहकांनी मुख्य बाजारपेठकडे पाठ फिरवली. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर व्हायरल होत असलेल्या मेसेजमुळे ग्राहकांमध्ये गैरसमज होत असून व्यापाऱयांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे असा मेसेज पसरवणाऱयांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार असल्याची माहिती व्यापारी महासंघाचे अध्यक्ष उदय पेठे यांनी दिली आहे.
रविवारी दिवसभर व्हॉट्सअपद्वारे हा मेसेज व्हायरला झाला. कोरोना रुग्णांची व दुकानांची नावे नमूद करून हा मेसेज सर्वत्र फिरत होता. त्यात रविवारी अनेक दुकाने बंदच असल्याने ही अफवा अधिकच पसरली. या मेसेजमुळे सोमवारी सकाळपासून ग्राहकांनी बाजारपेठेकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. नेहमी गजबजलेल्या राम आळी, गोखले नाका, राधाकृष्ण नाका, मारूती आळी, गाडीतळ या भागांमध्ये ग्राहकांची अत्यल्प गर्दी पहायला मिळाली. गोखले नाका या परिसरात शुकशुकाट होता. गणेशोत्सवासाठी बाजारपेठेतील सर्वच दुकाने साहीत्यासह सज्ज झाली आहे. अगोदरच लॉकडाऊनमुळे दोन महिन्यांहून अधिक काळ बाजारपेठ बंद होती. हा आठवडा खरेदी-विक्रीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असतानाच या व्हायरल मेसेजने व्यापाऱयांची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे असा मेसेज पसरवणाऱयांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन पोलीस अधीक्षकांना देण्यात येणार असल्याची माहिती उदय पेठे यांनी दिली.