ऑनलाईन टीम / तरुण भारत :
दौंडचे आमदार राहुल कुल यांना एका अनोळखी व्यक्तीने फोन करुन शिंदे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपद मिळविण्याकरिता 100 कोटी रुपयांची मागणी केली. याबाबतची माहिती कुल यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्यानंतर पोलिसांनी मुंबईतील हॉटेल ओबेरॉयमध्ये सापळा रचून चार आरोपींना अटक केली. आरोपींनी अशाचप्रकारे चार ते पाच आमदारांना फोन करुन मंत्रिपदाचे आमिष दाखवत कोटय़वधींची मागणी केल्याचे समोर आले आहे.
रियाज अल्लाबक्ष शेख (वय 41, कोल्हापूर), योगेश मधुकर कुलकर्णी (वय 57, पाचपाखाडी, ठाणे), सागर विकास संगवई (वय 37, पोखरण रस्ता, ठाणे) व जाफर अहमद रशीद अहमद उस्मानी (वय 53, नागपाडा, मुंबई) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आमदार कुल यांचे खासगी सचिव ओंकार थोरात (वय-29,रा. राहु, ता. दौंड,पुणे) यांनी याबाबत मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी दोन ते तीन वेळा कुल यांना फोन करून मी भाजपच्या एका मोठय़ा नेत्याच्या संपर्कात असल्याचं सांगितलं. तसेच राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपद देण्यासाठी 100 कोटींची मागणी केली. संबंधित व्यक्ती संशयास्पद वाटल्याने आमदार कुल यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर ही गोष्ट घातली. फडणवीस यांनी गुन्हा दाखल करुन पोलिसांना तपासाचे आदेश दिले. त्यानंतर 17 जुलैला आरोपीने ऑबेरॉय हॉटेलमध्ये आमदारांची भेट घेतली. मंत्रिमंडळात सहभागासाठी 90 कोटी रुपये लागतील, त्यातील 20 टक्के रक्कम म्हणजे 18 कोटी रुपये उद्या द्यावे लागतील, असे आमदारांना सांगितले.
ठरल्याप्रमाणे आरोपी दुसऱ्या दिवशी हॉटेल ओबेरॉयमधील कॅफेटेरिया येथे 18 कोटी रुपये घेण्याकरिता आला असता आमदार कुल व जयकुमार गोरे हे आरोपींना भेटले. त्यावेळी साध्या वेशातील पोलीस हॉटेलमध्ये आले व त्यांनी रियाज शेख या आरोपीस चौकशीकरिता ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्याकडे सखोल चौकशी करत त्याच्या अन्य तीन साथीदारांनाही अटक केली.
हेही वाचा : दोन कोटींची खंडणी मागणारा तोतया माहिती अधिकार कार्यकर्ता गजाआड