वृत्तसंस्था/ वाराणसी
108 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर कॅनडातून आलेली माता अन्नपूर्णा यांची मूर्ती अखेरीस स्वतःच्या श्रीकाशी विश्वनाथ धाममध्ये पोहोचली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मूर्तीची विधिवत पुनर्प्रतिष्ठापना करण्यासाठी वाराणसीत रविवारीच दाखल झाले होते. सोमवारी सकाळी विश्वनाथ मंदिराच्या पुजाऱयांनी मूर्तीच्या पुर्नस्थापनेसाठी पूजा-अर्चना केली आहे. सुमारे तासभर चाललेल्या पूजेनंतर योगींनी मूर्तीला श्री काशी विश्वनाथ धामच्या ईशान कोणमध्ये पुनर्स्थापित केले आहे.
काशी विश्वनाथ मंदिर विस्तारीकरणाच्या कार्यांमुळे अन्यत्र सुरक्षित ठेवण्यात आलेल्या 5 मूर्तींचीही यावेळी प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे. माता अन्नपूर्णा यांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेचा विधी ढोलवादन, शंखध्वनी आणि पुष्पवर्षावासह पार पडला आहे.
अन्नपूर्णा मातेची मूर्ती दाखल झाल्यावर वेदमंत्र, डमरू आणि शंखध्वनीसह मंदिर परिसर जयघोष सुरू झाला. दिल्लीहून निघालेली रथयात्रा अयोध्या, जौनपूरमार्गे रविवारी रात्री महादेवाची नगरी काशीमध्ये पोहोचली आहे. माता अन्नपूर्णेची मूर्ती पुनर्स्थापित करण्यापूर्वी योगींनी विधिवत काशी विश्वनाथमध्ये पूजा केली.माता अन्नपूर्णेच्या स्वागतासाठी विश्वनाथ मंदिराला 10 क्विंटल फुल-माळांनी आणि विद्युत रोषणाईने आकर्षकपणे सजविण्यात आले होते.
काशीची ओळख विश्वनाथ धाममुळेच आहे. 1916 मध्ये महात्मा गांधी येथे आले होते तेव्हा त्यांनी बाबा विश्वनथ मंदिराची गल्ली आणि तेथील अस्वच्छता पाहून तीव्र टिप्पणी केली होती. गांधींच्या नावावर सत्ता प्राप्त करणाऱयांनी गांधींचे म्हणणे कधी ऐकलेच नाही. पूर्वी भारताच्या मूर्ती तस्करीच्या माध्यमातून जगात पोहोचविल्या जात होत्या आणि यामुळे भारताच्या श्रद्धेला ठेच पोहोचत होती. पण आता शोधून-शोधून अशा मूर्ती भारतात परत आणल्या जात असल्याचे योगींनी म्हटले आहे.
1913 मध्ये झाली होती चोरी
18 व्या शतकातील देवी अन्नपूर्णाची मूर्ती 1913 मध्ये काशीमधून चोरीला गेली होती. 17 सेंटीमीटर उंचीची आणि 9 सेंटीमीटर रुंदीची ही मूर्ती कॅनडाच्या युनिव्हर्सिटी ऑफ रेजिना येथील मॅकेन्झी आर्ट गॅलरीत ठेवण्यात आली होती. कॅनडात आयोजित वर्ल्ड हेरिटेज सप्ताहादरम्यान भारतीय कलाकार दिव्या मेहरा यांची नजर या मूर्तीवर पडल्यावर त्यांनी हा विषय लावून धरला होता.