पाच वर्षांपासून निमशासकीय संस्थांचा सहभाग वाढला; मात्र शहरी भागातून निकृष्ट आहार पुरवठय़ाच्या अनेक तक्रारी
प्रतिनिधी /बेळगाव
अक्षर दासोह योजनेतून शाळांना निमशासकीय संस्थांकडून मध्यान्ह आहार वितरणाचा कल वाढत आहे. राजकीय नेत्यांचे या बाबतीतील स्वारस्य हा चर्चेचा मुद्दा झाला आहे. सध्या जिल्हय़ातील सात तालुक्यातील 1080 शाळांमधील 1 लाख 97 हजार 253 विद्यार्थ्यांना विविध निमशासकीय संस्थांकडून मध्यान्ह आहार पुरविला जातो पण शहरी भागातून याबाबत अनेक तक्रारी आहेत.
प्राथमिक आणि माध्यमिक विद्यार्थ्यांना शाळेकडे आकर्षित करण्यासाठी 2003 साली राज्यात मध्यान्ह आहार योजना सुरू करण्यात आली. सुरुवातीला शाळांमध्येच स्वयंपाक खोली व स्वयंपाकींची व्यवस्था केली होती. मात्र, गेल्या पाच वर्षांपासून निमशासकीय संस्थांचा सहभाग वाढला आहे. या एनजीओंकडून शाळांना आहार पुरविला जातो. जिल्हय़ात सात संस्थांकडून 1080 शाळांना आहार पुरविला जातो. अलीकडे यासाठी राजकीय नेत्यांचे स्वारस्य वाढले आहे.
दररोज 50 ते 200 शाळांना आहार
एकेका संस्थेकडून दररोज 50 ते 200 शाळांना आहार पुरविला जातो. त्यातील अनेक शाळा दुर्गम भागात आहेत. बेळगाव आणि खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील अनेक शाळांना संस्थांकडून आहार पुरवठा होतो. तो वेळेत पोहोचत नसल्याच्या तक्रारी वारंवार केल्या जातात. त्याशिवाय शहरी भागातील विद्यार्थ्यांनी या वाफेवर शिजविलेल्या आहाराकडे यापूर्वीच पाठ फिरविली आहे. एकीकडे तक्रारी वाढत असल्या तरी शाळांच्या स्वयंपाक घरांना टाळे ठोकून संस्थांमार्फत आहार पुरवठा करण्याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींचा वाढता कल आहे.
3028 शाळा सुपात
सुरुवातीला मोजक्याच शाळांना म्हणजे विशेषतः शहरी भागातील शाळांना संस्थांकडून मध्यान्ह आहार पुरविला जात होता. आता 1080 शाळांत आहार पुरविला जात असून जिल्हय़ातील 4108 शाळांपैकी 3028 शाळा सुपात आहेत. कारण काही आमदारांनी संस्थांमार्फतच आहार पुरविण्यासाठी आग्रह धरून तसे पत्रही सरकारला दिल्याचे वृत्त आहे.
संबंधित संस्थांना वेळोवेळी सूचना
मध्यान्ह आहार पुरवठा एनजीओंकडे देण्यात आलेला असला तरी स्वयंपाक खोल्या व कर्मचाऱयांवर गंडांतर आलेले नाही. संस्था केवळ आहार पुरवठा करतात. उर्वरित सर्व सोपस्कार शाळेत होतात. तक्रारी आहेत, त्याबाबत संबंधित संस्थांना वेळोवेळी सूचना केल्या जातात.
– लीलावती हिरेमठ, शिक्षणाधिकारी, अक्षर दासोह
एनजीओंकडून आहार पुरविल्या जाणाऱया तालुकानिहाय शाळा व विद्यार्थी संख्या
तालुका | शाळा | विद्यार्थी |
बेळगाव | 335 | 58608 |
बैलहोंगल | 108 | 19745 |
खानापूर | 127 | 15626 |
रामदुर्ग | 23 | 5455 |
सौंदत्ती | 63 | 19054 |
हुक्केरी | 203 | 36004 |
चिकोडी | 102 | 23505 |
अथणी | 87 | 13570 |
रायबाग | 32 | 5686 |
एकूण | 1080 | 197253 |