पुणे / प्रतिनिधी :
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (राज्य मंडळ) फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा जुन्या पद्धतीनेच घेतल्या जाणार आहेत. कोरोना काळात विशेष बाब म्हणून देण्यात आलेल्या शाळा तिथे परीक्षा केंद्र, वाढीव वेळ, अभ्यासक्रम कपात या सवलती रद्द करण्यात येणार आहेत. परीक्षेसाठी आता तीन-साडेतीन महिन्यांचा कालावधी हातात असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी कसून तयारी करावी लागणार आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वषी दहावी-बारावीच्या परीक्षांसाठी अभ्यासक्रमात 25 टक्के कपात करण्यात आली होती. ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा लेखन सराव कमी झाल्याचे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी अतिरिक्त वेळ देण्यात आला होता. विद्यार्थ्यांचा परीक्षेसाठी प्रवास टाळण्यासाठी शाळा तिथेच परीक्षा केंद्र पद्धत वापरण्यात आली. मात्र, यंदा परिस्थिती पूर्वपदावर आल्याने या सवलती रद्द करण्यात आल्या आहेत. यंदाची परीक्षा संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित असेल. तर राज्य मंडळाच्या नियोजनानुसार येणाऱ्या परीक्षा केंद्रावर परीक्षा द्यावी लागेल. तसेच अतिरिक्त वेळही दिला जाणार नाही.
अधिक वाचा : हुडहुडी! जळगाव, पुण्याचा पारा घसरला
राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी म्हणाले, गेल्यावर्षी विशेष बाब म्हणून अतिरिक्त वेळ, शाळा तिथे परीक्षा केंद्र, अभ्यासक्रम कपात या सवलती देण्यात आल्या होत्या. यंदा पूर्वीच्याच पद्धतीनुसार परीक्षा होईल.