दहावीचे वर्ष हा आयुष्यातील पहिला महत्त्वाचा टप्पा. दहावी, बारावी आणि पदवीचे मार्क करियरच्या पहिल्या किमान पाच-दहा वर्षात बायोडेटा भरताना लिहावे लागतात. महाविद्यालयामध्ये प्रवेश घेताना दहावीचे मार्क महत्त्वाचे असतात. दहावीच्या परीक्षेमध्ये अपेक्षित मार्क मिळवल्यास विद्यार्थ्याला स्वतःच्या मनाप्रमाणे करियर करता येते. शिक्षणावर कमीत कमी खर्च करावा, अशी अपेक्षा असेल तर दहावी-बारावीचे मार्क उत्तम असावे लागतात.
दहावीची परीक्षा ही पहिली परीक्षा असते ज्यामध्ये उत्तरे तपासणारी व्यक्ती विद्यार्थ्याला ओळखत नसते, त्यामुळे तटस्थ वृत्तीने मार्क देणे अपेक्षित असते. प्रत्येक शालेय विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अशी ही महत्त्वाची परीक्षा 2 मार्च 2023 पासून सुरू होणार असल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने जाहीर केले आहे. त्यासाठीचे फॉर्म बहुदा सर्व विद्यार्थ्यांचे भरून झालेले असतील. त्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांनी त्यासाठी नियोजन करणे अपेक्षित आहे. परंतु जवळजवळ दहा शाळांमधील 300 विद्यार्थ्यांशी ‘अभ्यास कसा करावा’ या विषयावर संवाद साधल्यावर लक्षात आले की बहुतेक विद्यार्थ्यांनी त्याचे नियोजन केलेले
नाही.
आजपासून शंभर दिवसांवर येऊन ठेपलेल्या या परीक्षेसाठी अभ्यासाचे नियोजन केले तरच ही परीक्षा कोणत्याही ताण-तणावाशिवाय देता येईल आणि त्यामध्ये यश मिळू शकेल. `If you fail to plan, you plan to fail’ या उक्तीनुसार पुढील शंभर दिवसांचे नियोजन करावे. दहावीच्या बोर्डाने परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्याचा एक तक्ता स्वतःच्या सुवाच्य अक्षरामध्ये लिहून घरामधील भिंतीवर लावावा. तारीख, वार, वेळ, विषय आणि किती मार्काची परीक्षा असणार आहे याचा तक्ता तयार करावा, तो पुन्हा एकदा बोर्डाच्या वेबसाईटनुसार पडताळून पहावा आणि पालक/मित्र-मैत्रिणीकडून तपासून घ्यावा.
रोज एका विषयाच्या क्रमिक पुस्तकाचे वाचन सलग तीन तास करणे आवश्यक आहे. सर्व विषयांना समान न्याय दिल्यामुळे सर्वच विषयांमध्ये चांगले गुण मिळून सरासरी उत्तम येऊ शकते. 20-20 क्रिकेट सामन्याप्रमाणे शेवटच्या काही ओव्हर्समध्ये फटकेबाजी करून अधिक धावा बोर्डाच्या पेपरमध्ये मिळवता येत नाहीत. अनेक विद्यार्थ्यांनी न आवडणाऱया विषयाचे पुस्तक शेवटपर्यंत उघडलेले नसते. त्यामुळे रोज एक विषयाचे वाचन करणे आवश्यक ठरते. कोणत्या दिवशी कोणता विषय निवडावा याचे आठवडय़ाचे वेळापत्रक करताना विषयाचा क्रम बोर्डाच्या परीक्षेच्या क्रमानुसार असावा. त्यामुळे पुढील शंभर दिवसात त्या क्रमाची सवय लागेल. सोमवारी प्रथम भाषा, मंगळवारी द्वितीय भाषा, बुधवारी तृतीय भाषा, गुरुवारी गणित-भूमिती, शुक्रवारी विज्ञान (1 आणि 2), शनिवारी इतिहास-भूगोल आणि नागरिकशास्त्र असा सर्वसाधारण क्रम असेल. ‘अजून आम्हाला हा धडा शिकवलेला नाही’ अशी उत्तरे बरेच शालेय विद्यार्थी देतात. शालेय शिक्षकांवर अवलंबून राहणे आता सर्वच विद्यार्थ्यांनी थांबवणे गरजेचे आहे.
काही शाळांमध्ये डिसेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात उर्वरित सर्व धडे शिकवले जातील. त्यामुळे आता क्रमिक पुस्तके वाचताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्व धडे वाचावे. कोणताही धडा/परिच्छेद ‘ऑप्शन’ला टाकू नये. गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे काही धडे वगळण्यात आले होते. यावर्षी तशी शक्यता नाही. तरीही अशा अफवा ऐकू आल्या तर त्यावर विश्वास ठेवू नये.
रविवारी एक तास विज्ञानाच्या आकृत्या काढणे, एक तास भूमितीच्या आकृत्या काढण्यासाठी राखून ठेवावे आणि प्रत्येक आकृती तीन ते चार मिनिटामध्ये नामनिर्देशांसह काढून पूर्ण करण्याचा सराव करावा. दर रविवारी एका तासात 3 निबंध लिहिण्याचा सराव करावा. सहसा निबंध लिहिण्यासाठी अनेक विद्यार्थी बराच वेळ घेतात. त्यामुळे वेळेचे नियोजन करण्याचा सराव करण्याला पर्याय नाही. एक पत्र लिहिण्यासाठी 10 मिनिटापेक्षा अधिक वेळ घालवू नये. त्यामुळे अर्ध्या तासात तीन पत्रे लिहिण्याचा सराव रविवारी करावा. एका रविवारी मराठी निबंध-पत्रे, दुस्रऱया रविवारी इंग्रजी आणि तिसऱया रविवारी हिंदी असे नियोजन करावे. पुढील शंभर दिवसांचे असे नियोजन एका डायरीमध्ये लिहून ठेवावे.
विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सर्वात जास्त वेळ लिहिण्यामध्ये व्यतीत होतो. त्यामुळे वाचनाला वेळ मिळत नाही अशी तक्रार अनेक विद्यार्थ्यांनी केली. बरेच विद्यार्थी पुस्तकामध्ये, गाईडमध्ये बघून प्रश्नांची उत्तरे बराच वेळ लिहित बसतात. घरातील असे दृश्य बघितल्यावर पालकांना विलक्षण समाधान मिळते. परंतु क्रमिक पुस्तकाचे वाचन हा पाया आहे आणि वाचनाशिवाय प्रश्नांची उत्तरे लिहिण्याला काही अर्थ नाही. त्यामुळे आपला पाल्य रोज किती वेळ वाचन करतो-करते? याकडे पालकांनी लक्ष द्यावे. खरे तर विद्यार्थ्यांनी डायरीमध्ये रोज किती वेळ वाचन केले आणि त्या वेळामध्ये किती पाने वाचून झाली याचा तक्ता तयार करावा. मी ज्या 300 विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्यांच्यापैकी एकाही विद्यार्थ्याचे कोणत्याही विषयाचे अर्धे पुस्तक वाचून झालेले नव्हते. इतकेच नव्हे तर, दहावीच्या विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षी नववीची क्रमिक पुस्तके किमान एकदा वाचलेलीच नाहीत.
अनेक शहरी विद्यार्थ्यांचा वेळ वेगवेगळ्या कोचिंग क्लासेसमध्ये जातो. काही विद्यार्थ्यांनी सांगितले की रोज त्यांचे आठ तास शाळेमध्ये, तीन तास कोचिंग क्लासेसमध्ये आणि दोन तास घर-शाळा-क्लास-घर अशा प्रवासामध्ये जातात. घरी पोहोचल्यानंतर हे विद्यार्थी रोज एक-दोन तास शाळा-कोचिंग क्लासचा लेखी अभ्यास करण्यात घालवतात. कोणत्याही विद्यार्थ्यासाठी रोज आठ तास झोप आवश्यक आहे. याचा विचार करता विद्यार्थ्यांकडे पुस्तक वाचनासाठी वेळ मिळत नाही. याचा मुख्य दोष पालकांकडे जातो. कारण त्यांनीच आपल्या पाल्यांना कोचिंग क्लासेसच्या चक्रात अडकवले आहे. स्व-अभ्यास म्हणजेच क्रमिक पुस्तकाचे वाचन न करता निव्वळ कोचिंग क्लास लावल्यामुळे दहावीमध्ये उत्तम मार्क मिळवण्याची अपेक्षा धरता येणार नाही.
त्यामुळे विद्यार्थ्यांनी रोज तीन तास क्रमिक पुस्तकांचे वाचन करणे गरजेचे आहे. सर्व क्रमिक पुस्तकांचे पहिले वाचन 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण झाल्यास डिसेंबरच्या पहिल्या पंधरा दिवसात दुसऱयांदा वाचन पूर्ण करता येईल. त्यानंतर डिसेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात गेल्या काही वर्षातील बोर्डाच्या परीक्षांचे पेपर घरी सोडवण्याचे नियोजन करावे. पेपर घरी सोडवताना बोर्डाने नेमून दिलेल्या वेळेत पेपर सोडवता येणे अपेक्षित आहे, त्यामुळे सराव ठरावीक वेळेत करावा. जानेवारी 2023 च्या पहिल्या किंवा दुसऱया आठवडय़ात अनेक शाळांनी पूर्वपरीक्षेचे नियोजन केले असेल. तत्पूर्वी परीक्षेचा सराव घरी झाल्यास पूर्वपरीक्षेचा उद्देश सफल होईल.
पूर्वपरीक्षा झाल्यानंतर स्वतःच्या हस्ताक्षरातील नोट्स/गाईड वाचून प्रश्नांची उत्तरे लिहिण्यात आपली चूक कुठे होत असते याचा आढावा घ्यावा. मुद्देसूद उत्तरे लिहिणे ही एक कला आहे असे समजून त्यावर विचार आणि सराव करणे गरजेचे आहे. त्यानंतर एक पेपरसेट घरी सोडवावा. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ात एका पेपरसेटमधील सर्व प्रश्न अधिक वेळ देऊन सोडवावेत. तीन पैकी एक निबंध लिहा असा प्रश्न असल्यास सर्व निबंध लिहावेत. पाच पैकी तीन प्रश्नांची थोडक्यात उत्तरे द्या, असा प्रश्न असल्यास फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ात सर्वच प्रश्नांची उत्तरे लिहिता येतात की नाही, याची खातरजमा केल्यामुळे परीक्षेची भीती कमी होईल आणि कोणताही प्रश्न विचारल्यास उत्तर देण्याची मानसिक तयारी झालेली असेल.
नियोजनाप्रमाणे अभ्यास होत आहे की नाही? यावर पालकांनी लक्ष ठेवावे. नियोजनाप्रमाणे अभ्यास झाला नसल्याचे पहिल्या सात दिवसात निदर्शनास आल्यास त्वरित सुधारित नियोजन करावे. बोर्डाच्या परीक्षेसाठी अभ्यासाच्या नियोजनामध्ये पालकांची भूमिका महत्त्वाची असते. सकारात्मक वातावरण असलेल्या घरामध्ये मुला-मुलींचा अभ्यास उत्तम होतो. घरामध्ये तगादा लावणारे पालक असल्यास विद्यार्थी घरामध्ये कमीत कमी वेळ थांबणे पसंत करतात. घरामध्ये दहावीचा पाल्य असल्यास टीव्हीवर पालकांनी काय बघायचे नाही याचे भान ठेवावे. मुलांच्या आहाराकडे पालकांनी लक्ष दिल्यास त्याचा विद्यार्थ्याना उपयोग होतो. लक्ष देणे आणि लक्ष ठेवणे यातला फरक सुजाण पालक जाणतातच. भरपेट न्याहारी, दुपारचे चौरस जेवण आणि रात्री 8 पूर्वी मोजकेच जेवण, दिवसभर ठरावीक अंतराने पाणी पिणे अशी काळजी एकूणच कुटुंबाने घेतल्यास विद्यार्थ्याना एकूण दिवसाचे नियोजन करणे सोयीस्कर जाईल. वडीलधाऱया मंडळींचा दृष्टीकोन ‘आधी केले आणि मग सांगितले’ असा असावा.
उर्वरित शंभर दिवसांमध्ये नियोजनाप्रमाणे अभ्यास करण्यासाठी दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा! सुहास किर्लोस्कर