दोन्ही जिल्ह्यात 114 परीक्षा केंद्र
रत्नागिरी प्रतिनिधी
विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा असलेल्या दहावीच्या (एसएससी) परीक्षेला आज गुरूवार 2 मार्चपासून प्रारंभ झाला आहे. या परीक्षेसाठी कोकण बोर्डामार्फत कडक नियोजन करण्यात आले आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यातून एकूण 28 हजार 468 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षा शांततेत व कॉपीमुक्त पार पडावी, यासाठी राज्य मंडळाने व कोकण विभागीय मंडळाने लक्ष वेधले आहे. 16 भरारी पथकांची नजर राहणार आहे.
कोकण विभागीय मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, दहावी परीक्षेसाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जिह्यात 73 परीक्षा केंद्रे निश्चित केली आहेत. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातही 41 परीक्षा केंद्रे ठेवण्यात आली आहेत. या दोन्ही जिल्ह्यात एकूण 114 परीक्षा केंद्रांचा समावेश आहे. त्यात मुख्य, उपकेंद्रांचाही समावेश करण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात परीरक्षक केंद्रांची संख्या 13 तर सिंधुदुर्गमध्ये 9 अशा एकूण 22 परिरक्षक केंद्रांचा समावेश आहे.
दहावीच्या परीक्षेसाठी दोन्ही जिल्ह्यातील एकूण 28 हजार 468 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यात रत्नागिरी जिल्ह्यात 19 हजार 199 तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 9 हजार 269 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. आज गुरुवार 2 मार्च रोजी सकाळी 11 वाजता मराठी विषयाच्या पेपरने या परीक्षेला पारंभ होणार आहे. 25 मार्च रोजी ही परीक्षा संपणार आहे. दरम्यान, राज्यात दहावी व बारावीच्या परीक्षा केंद्रावर होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी पूर्ण राज्यात ‘कॉपीमुक्त अभियान’ राबवण्यात येत आहे. या अभियानात राज्याचा ‘नोडल अधिकारी’ म्हणून शिक्षण आयुक्त यांना आणि प्रत्येक जिल्हाधिकाऱयांना तसेच ‘समन्वयक अधिकारी’ म्हणून माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना नियुक्त करण्यात आले आहे.
जिह्यात कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रांवर दक्षता समिती नेमण्यात आली आहे. परीक्षा केंद्राच्या 50 मीटरच्या कक्षेत कोणीही येऊ नये, याची दक्षता या समितीमार्फत घेण्यात येणार आहे. यंदा मंडळाच्यावतीने धोरणांतर्गत सकाळच्या सत्रात 11 वाजता परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांना 10.30 च्या आत परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावे लागणार आहे. तसेच दुपारच्या सत्रात 3 वाजता पेपर असल्याने विद्यार्थ्यांना 2.30 च्या आत परीक्षा केंद्रावर येणे गरजेचे असल्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रश्नपत्रिकांचे वाटप सकाळ सत्रात 11 वाजता आणि दुपारच्या सत्रात 3 वाजता करण्यात येणार आहे.
इयत्ता दहावी परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी जिल्ह्यात परीक्षा केंद्र परिसरात 2 ते 25 मार्च 2023 या कालावधीत (ज्या दिवशी पेपर नसतील ते दिवस वगळून) दररोज सकाळी 7 वाजल्यापासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत कलम 144 लागू असणार आहे. यानुसार मोबाईल फोन व त्या संबंधी इलेक्ट्रॉनिक साहित्य बाळगण्यास वापरण्यास, झेरॉक्स मशिन, फॅक्स मशिन आणि लॅपटॉप यांचा वापर करण्यास बंदी घातली आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती फौजदारी कारवाईस पात्र राहणार आहेत. हा बंदी आदेश परीक्षेच्या कामकाजासाठी नेमलेले अधिकारी व कर्मचारी यांना व त्यांना नेमून दिलेल्या परीक्षेच्या कामकाजासाठी हाताळाव्या लागणाऱ्या उपकरणांसाठी लागू राहणार नसल्याचे सांगण्यात आले.