पुणे / प्रतिनिधी :
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या पुरवणी परीक्षेचा राज्याचा निकाल ३०.४७ टक्के लागला आहे. एकूण ५ हजार ८०३ विद्यार्थी पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा निकालात केवळ १ टक्का वाढ झाली आहे. एक किंवा दोन विषयात उत्तीर्ण न होऊ शकलेल्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या ७ हजार ६४३ एवढी आहे. हे विद्यार्थी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये ए.टी.के.टी. सवलतीद्वारे इयत्ता अकरावी प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत.
राज्य मंडळाने शुक्रवारी दुपारी १ वाजता ऑनलाइन निकाल जाहीर केला. दहावीची पुरवणी परीक्षा दि. २७ जुलै ते १२ ऑगस्ट या कालावधीत घेण्यात आली. राज्याच्या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण २० हजार ५१७ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी १९ हजार ४२ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. विभागनिहाय निकालात लातूर विभागाचा सर्वाधिक ५१.७४ टक्के निकाल लागला आहे. तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा २२.६२ टक्के इतका लागला आहे. नोव्हेंबर-डिसेंबर २०२० मध्ये ३२.६० टक्के निकाल लागला. तर सप्टेंबर-ऑक्टोबर २०२१ मध्ये २९.१४ टक्के निकाल लागला. राज्य मंडळाने परीक्षा काळातील संभाव्य गैरप्रकारांना आळा बसावा, यादृष्टीने मंडळामार्फत संपूर्ण राज्यात भरारी पथके नेमण्यात आली होती. याशिवाय प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती स्थापन करण्यात आली होती.
अधिक वाचा : पवना धरणात बुडून 2 पर्यटकांचा मृत्यू; 5 जणांना वाचविण्यात यश
ऑनलाइन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून दहावी व बारावी पुरवणी परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. गुणपडताळणीसाठी दि. ३ सप्टेंबर ते १२ सप्टेंबरपर्यंत व छायाप्रतीसाठी दि. ३ सप्टेंबर ते २२ सप्टेंबरपर्यंत अर्ज ऑनलाइन करता येईल. जुलै-ऑगस्ट २०२२ पुरवणी परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे.
विभागनिहाय निकाल
पुणे : २४.७३
नागपूर : ४५.६५
औरंगाबाद : ३९.७६
मुंबई : २२.६२
कोल्हापूर : ३२.८४
अमरावती : ३९.६३
नाशिक : ३९.१३
लातूर : ५१.७४
कोकण : ३५.५९