सिंगापूरमधील संशोधनातून समोर आली माहिती : डिस्चार्ज धोरण ठरविण्यास उपयुक्त
वृत्तसंस्था/ सिंगापूर
कोरोनाचा संसर्ग झाल्याच्या 11 दिवसांनी बहुतांश रुग्णांमधून इतरांमध्ये संसर्ग फैलावण्याचा धोका जवळपास नसतो, असा दावा सिंगापूर येथील राष्ट्रीय साथरोग केंद्राच्या (एनसीआयडी) अध्ययन अहवालात करण्यात आला आहे. संशोधकांनी कोरोनाबाधित असलेल्या 73 जणांवर संशोधन केले आहे. लक्षणे दिसून आल्यावर 7 दिवसांपर्यंत रुग्णामध्ये विषाणूचे प्रमाण वाढणे आणि हवेत त्याचा फैलाव होण्याची शक्यता अधिक असते. परंतु आठव्या ते 10 व्या दिवसाच्या आतच संसर्ग कमजोर पडू लागतो आणि 11 व्या दिवशी पूर्णपणे नष्ट होतो असे या अहवालात म्हटले गेले आहे.
सिंगापूरमधील नियमानुसार कोरोनाबाधिताला 24 तासांच्या अंतराने दोन स्वॅब चाचण्या निगेटिव्ह आल्यावर डिस्चार्ज दिला जातो. एनसीआयडीनुसार स्वॅब तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह येण्याचा अर्थ बाधित इतरांमध्ये संसर्ग फैलावाचे कारण ठरू शकतो असा होत नाही. प्रत्यक्षात स्वॅब चाचणी सार्स-कोव-2 च्या जिनोमच्या अस्तित्वाचा शोध घेते. परंतु बाधितामध्ये या विषाणूचा किती फैलाव शिल्लक आहे हे यातून स्पष्ट होत नाही. बाधितांमध्ये या विषाणूचा अंश असल्यास तो इतरांमध्ये फैलाव करण्याची क्षमता बाळगतो का नाही हे यातून स्पष्ट होत नाही.
संसर्गाची लक्षणे दिसून आल्याच्या 11 दिवसांनी रुग्ण इतरांसाठी धोकादायक राहत नाही, असे एनसीआयडीचे संचालक लियो यी यांनी म्हटले आहे.
या संशोधनानंतर सिंगापूरमध्ये कोरोना बाधितांसाठी तयार करण्यात आलेले नियम बदलले जाऊ शकतात. या संशोधनाचे निष्कर्ष अत्यंत अचूक आहेत. कोविड-19 ला तोंड देणाऱया रुग्णांवर ते लागू करणे सुरक्षित आहे. गंभीर आजारी असणाऱयांना दीर्घकाळापर्यंत वैद्यकीय मदतीची गरज भासते. अशा रुग्णांकडून इतरांना संसर्गाचा धोका नसला तरीही त्यांच्या प्रकृतीसाठी त्यांच्यावर उपचार सुरूच ठेवावेत, असे उद्गार संशोधनात सामील भारतीय वंशाचे डॉक्टर अशोक कुरुप यांनी काढले आहेत.