सर्व मृत एकाच कुटुंबातील : तपासास प्रारंभ
वृत्तसंस्था/ जोधपूर
राजस्थानच्या जोधपूरमध्ये 11 पाकिस्तानी शरणार्थींचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक तपासानुसार विषारी वायू किंवा विषप्रयोगाद्वारे या सर्वांचा मृत्यू झाल्याचे मानले जात आहे. देचू पोलीस स्थानकाच्या हद्दीतील लोडता भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासास प्रारंभ केला आहे. सर्व मृत पाकिस्तानातून आलेले शरणार्थी आहेत. हे कुटुंब नजीकच्या गावात जमीन कसायला घेऊन शेती करत होते.
एकाचवेळी 11 मृतदेह मिळाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. 6 प्रौढ आणि 5 मुलांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 7 महिला आणि 4 पुरुषांचा समावेश आहे. राजस्थानच्या सीमावर्ती गावांमध्ये पाकिस्तानातून आलेल्या शरणार्थींनी मोठय़ा प्रमाणावर आश्रय घेतला आहे. अनेक गावांची जवळपास पूर्ण लोकसंख्या पाकिस्तानी शरणार्थींची आहे. पाकिस्तानात धार्मिक अत्याचार होत असल्याने तेथील हिंदू भारतात धाव घेत आहेत. अशा शरणार्थींची राजस्थानात सर्वाधिक संख्या आहे.
महिलेवर संशय
कुटुंबातील एक महिला पेशाने परिचारिका असून ती रक्षाबंधनानिमित्त तेथे आली होती. तिनेच या 10 जणांना विषारी इंजेक्शन टोचल्याचे आणि नंतर स्वतःला इंजेक्शन टोचून घेत आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. शेतात राहणाऱया या कुटुंबात एकूण 12 होते आणि यातील 11 जणांचा मृत्यू झाला आहे. एक सदस्य शेतातील कुपनलिकेच्या दिशेने गेला होता, म्हणून बचावला आहे.
न्यायवैद्यक पथक दाखल पोलिसांनी तपासास प्रारंभ केला असून न्यायवैद्यक विभागाचे पथक तेथे दाखल झाले आहे. घटनास्थळावर आढळून येणारे पुरावे जमवून गुन्हय़ाची उकल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हत्या तसेच आत्महत्या या दोन्ही शक्यता गृहित धरून पोलिसांकडून तपास केला जात आहे. तसेच एकमात्र जिवंत बचावलेल्या सदस्याचीही कसून चौकशी केली जाणार आहे. त्याच्यावरही तपास यंत्रणांकडून संशय व्यक्त होत आहे.