कोअर कमांडर स्तरीय चर्चा ः तणाव कमी करण्याचा होणार प्रयत्न
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारत आणि चीन तणाव कमी करण्यासाठी पुन्हा एकदा कोअर कमांडर स्तरीय चर्चा करणार आहेत. ही चर्चा 11 मार्च रोजी भारताच्या चुशुल मोल्डोमध्ये होणार आहे. दोन्ही देशांदरम्यान 14 जानेवारी रोजी 14 व्या फेरीतील चर्चा निष्फळ ठरली होती. या बैठकीत भारताने हॉट स्पिंग, डेसपांग आणि डेमचोक भागांमधून सैनिकांच्या पूर्ण माघारीवर भर दिला होता.
15 व्या फेरीतील चर्चेसाठी भारत आणि चीन सहमत झाले आहेत. गलवान खोऱयात झटापटीनंतर भारत आणि चीन यांच्यात तणावाची स्थिती आहे. दोन्ह देशांदरम्यान आतापर्यंतच्या चर्चेत विशेष प्रगती होऊ शकलेली नाही. सीमेवर हजारो सैनिक अद्याप तैनात आहेत. भारताने चीनच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवण्यासठी सीमेवर अत्यंत दक्षता बाळगली आहे. तसेच अवजड शस्त्रसामग्रीसह सैन्य सीमेवर तैनात आहे. परंतु दोन्ही देशांचे सैन्य कमांडर पुन्हा चर्चेसाठी सहमत झाल्याने काही सकारात्मक निष्कर्ष निघण्याची अपेक्षा आहे.
भारत चीनसोबत पूर्व लडाखमध्ये तणाव असलेल्या उर्वरित ठिकाणांवरील म्हणजेच पेट्रोलिंग पॉइंट 15 (हॉट स्प्रिंग्स), देपसांग बुलगे आणि डेमचोकमधील तणाव कमी करण्यासंबंधी चर्चा करत आहे. पँगोंग सरोवर क्षेत्रात हिंसक झटापटीनंतर 5 मे 2020 रोजी भारत आणि चिनी सैन्यांदरम्यान पूर्व लडाखमध्ये तणाव सुरू झाला होता. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर दोन्ही देशांचे सुमारे 50 ते 60 हजार सैनिक तैनात ताहेत.