प्रतिनिधी / बेळगाव :
गेल्या आठवडय़ात दोडवाड (ता. बैलहोंगल) येथे एकाच कुटुंबातील तिघा जणांचा रात्री झोपेत असताना भीषण खून करण्यात आला होता. या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून गुरुवारी चौघा जणांना अटक करण्यात आली आहे. 12 एकर जमिनीच्या तुकडय़ासाठी हे हत्याकांड घडले आहे.
जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. यावेळी अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख अमरनाथ रेड्डी, बैलहोंगलचे एएसपी प्रदीप गुंटी, गुन्हे तपास विभागाचे पोलीस निरीक्षक निंगनगौडा पाटील आदी अधिकारी उपस्थित होते. पोलीस मुख्यालयात ही पत्रकार परिषद झाली.
शिवाप्पा बसाप्पा भगवंतण्णावर (वय 32) रा. लोकूर, ता. धारवाड, गोविंद शिवपुत्राप्पा संगोळ्ळी (वय 50), बसवंत अंबाण्णा अंदानशेट्टी (वय 38), मल्लिकार्जुन अंबाण्णा अंदानशेट्टी (वय 35) तिघेही राहणार दोडवाड अशी अटक करण्यात आलेल्या चौघा जणांची नावे आहेत. या चौकडीला गुरुवारी पोलीस मुख्यालयात आणण्यात आले होते.
18 जानेवारी रोजी रात्री 11 नंतर ही घटना घडली आहे. दुसऱया दिवशी हा थरार उघडकीस आला होता. रामलिंगेश्वर गल्ली, दोडवाड येथील शिवानंद बसवंतप्पा अंदानशेट्टी (वय 60), त्यांची दुसरी पत्नी शांतव्वा (वय 40), मुलगा विनोद (वय 26) यांचा भीषण खून करण्यात आला होता. यासंबंधी दोडवाड पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला होता.
सुरुवातीला शिवानंदच्या भाऊबंदांवर संशय व्यक्त करण्यात आला होता. घराशेजारच्या जागेच्या वादातून अधूनमधून तंटे होत होते. याच प्रकारातून हे हत्याकांड घडल्याचा संशय होता. मात्र, पोलिसांनी चौघा जणांना अटक करून त्यांची कसून चौकशी केली असता धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून एकाच युवकाने अत्यंत थंड डोक्मयाने तिघा जणांचा खून केला आहे व उर्वरित तिघांनी त्याला खुनासाठी प्रवृत्त केल्याचे उघड झाले आहे.
शिवाप्पा भगवंतण्णावर हा प्रमुख मारेकरी आहे. शिवाप्पा हा खून झालेल्या शिवानंदचा जवळचा नातेवाईक असून शिवानंद व त्याची पहिली पत्नी कस्तुरी या दांपत्याला अपत्ये झाली नाहीत म्हणून शिवानंदने आपल्याच नात्यातील शिवाप्पाचा मुलाप्रमाणे सांभाळ केला होता. सात वर्षांपूर्वी शिवानंदने धारवाड जिल्हय़ातील शांतव्वाशी दुसरे लग्न केले. शांतव्वाला पहिल्या पतीपासून एक मुलगा विनोद व मुलगी विद्या अशी अपत्ये होती. शांतव्वाबरोबर लग्न केल्यानंतर शिवानंदने याच अपत्यांना आपले मानले.
दुसरीकडे शिवानंदची पहिली पत्नी कस्तुरी ही आपल्या भावाकडे राहात होती. खून करणारा शिवाप्पा हा कस्तुरीकडे राहात होता. 30 जानेवारी रोजी शांतव्वाचा मुलगा विनोदचे लग्न ठरविण्यात आले होते. जर त्याचे लग्न झाले तर शिवानंदची 12 एकर जमीन विनोदच्या नावे होणार आणि मग आपले काय? या प्रश्न शिवाप्पाला पडला होता. त्यामुळे शिवानंद व त्याच्या कुटुंबीयांना संपविण्याचा निर्णय त्याने घेतला. त्याला उर्वरित तिघा जणांनी फूस दिल्याचे जिल्हा पोलीसप्रमुखांनी सांगितले.
घरात राहूनच काढला काटा
18 जानेवारी रोजी रात्री शिवाप्पा भगवंतण्णावर हा शिवानंदच्या घरीच रहायला आला होता. रात्री सर्वांनी एकत्र जेवण केले. जेवणानंतर शिवाप्पा व शिवानंदचा मुलगा विनोद हे दोघे एकाच ठिकाणी झोपले. मध्यरात्री विनोद झोपी गेल्याची खात्री करून ट्रक्टरच्या एका अवजाराने शिवाप्पाने प्रथम झोपलेल्या विनोदचा काटा काढला. त्यानंतर शिवानंदला हाक मारली, ‘मामा मी ऊस तोडायला जाणार आहे, दार उघड’ असे सांगताच शिवानंदने दार उघडले. पायात चप्पल घालून लघुशंकेसाठी तो घराबाहेर पडला. त्यावेळी शिवाप्पाने त्याच अवजाराने त्याच्या डोक्मयावर वार करून त्यालाही संपविले. शिवानंदच्या किंकाळय़ा ऐकून पत्नी शांतव्वाला जाग आली. ती अंथरुणात उठून बसली असतानाच शिवाप्पाने तिलाही संपविले. तिहेरी हत्याकांड घडविणारा शिवाप्पा हा शिवानंद अंदानशेट्टीची पहिली पत्नी कस्तुरीच्या भावाचा मुलगा आहे.