भिमापूरवाडीचे शिक्षक विद्यासागर जमदाडे यांचा प्रयोग
आज अनेक शेतकरी आपल्या 5 ते 10 एकर शेतात सर्व सुविधा असतानाही वर्षाकाठी एकच पीक घेतात आणि शेतीतून नफा मिळत नसल्याचा कांगावा करतात. पण भिमापूरवाडी येथील शिक्षक विद्यासागर भरमू जमदाडे यांनी आपल्या 12 गुंठय़ातील जागेत केळी, मूग, उडीद, झेंडू, कांदा, मेथी, कोथिंबीर अशी 7 पिके यशस्वीरित्या घेतली आहेत. आपल्या विविध पिकाद्वारे जमदाडे यांनी इतर शेतकऱयांपुढे आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी नियोजनातून केलेली दर्जेदार शेती पाहण्यासाठी शेतकऱयांची गर्दी होत आहे.
विद्यासागर जमदाडे हे एका खासगी शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. ते नेहमीच वेगवेगळे प्रयोग करीत असतात. आपण एका पिकात अनेक पिकांचे उत्पादन घेऊ शकतो. अंतरपीक हे शेतकऱयांना फायद्याचेच आहे. जमदाडे हे शिक्षक असले तरी आपल्या शेतातील आलेले उत्पादन आजूबाजूच्या गावातील बाजारात जाऊन विक्री करतात. यामुळे त्यांना शेतीत फायदा होत असतो. जमदाडे यांनी आपल्या 12 गुंठे शेतात केळीचे उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी प्रथम बारा गुंठय़ात दोन ट्रॉली शेणखत टाकून उभी व आडवी नांगरणी केली. पल्टी व रोटर मारले.
यानंतर 3.25 फुटी सऱया सोडले. त्यातील एका सरीत उडीद व एका सरीत मूग टाकले. त्यावर किटक नाशक फवारणी केली. त्यातून 50 किलो उडीद व 50 किलो मुगाचे उत्पादन झाले. त्यातून 10 हजार रुपयाचा नफा झाला. जी सरी रिकामी होती त्या सरीत 16 ऑगस्ट रोजी केळीच्या रोपांची लावण केली. निलजी संकेश्वर येथून जी-9 सई जातीची रोपे आणली. 15 रुपये प्रति रोपाला खर्च करण्यात आला. 12 गुंठय़ात 370 रोपांची लावण केली. 5ƒ6 आकारात लावण करण्यात आली. लावणीच्या दुसऱया दिवशी आळवणीसाठी 22 टीन, 19:19, 13.:40:13 व हय़ुमिक ऍसीड या सर्वांचे विश्रण करुन रोपांना घातले. यानंतर प्रत्येक आठ दिवस याप्रमाणे औषध फवारणी करण्यात येत आहे.
दोन केळीच्या रोपांमध्ये कांदा तरुची लावण करण्यात आली. पण सदर कांदाभाजी विक्री करुन 10 हजाराचा नफा मिळवला. 18 ऑगस्ट रोजी कलकत्ता भगवा झेंडू फुलाच्या रोपाची लावण करुन केळीच्या एका बाजुने व बोदावर झेंडूची लावण केली. यातून 800 किलो फुलांचे उत्पादन मिळाले. प्रति किलो 60 रुपये दर मिळाला. यातूनही बऱयापैकी उत्पादक मिळाले. ऑक्टोबर महिन्यात दोन केळीच्या सरीमध्ये मेथी व कोथिंबीरीचे उत्पादन घेण्यात आले. प्रति पेंडीला 5 रुपये प्रमाणे मेथी व कोथिंबीरची विक्री करण्यात आली. यातून 2 ते 2.5 हजार रुपयाचे उत्पादन निघाले. केळी पिकात घेण्यात आलेले प्रत्येक उत्पादनाची बाजारात बसूनच त्यांनी विक्री केली. या अंतरपिकाबरोबरच आताचे केळीचे पीकही उत्तम प्रकारे आले आहे. ऑगस्ट महिन्यापासून आतापर्यंत केळी पिकातून घेतलेल्या अंतरपिकातून 30 ते 40 हजाराचा नफा झाला आहे. पण यासाठी बाजाराचा अभ्यास व बाजारातील मागणीचा विचार करुन उत्पादन घेण्यात आले. योग्य वेळी योग्य उत्पादन घेतल्याने जास्त फायदा झाल्याचे विद्यासागर जमदाडे यांनी सांगितले.
विद्यासागर जमदाडे यांनी केळी पिकात कांद्याचे पिकही घेतले होते. पण ते कांद्याची भाजी म्हणूनच विक्री केली. कांद्याचे दर वाढणार असल्याचा अंदाज असता तर आज 12 गुंठय़ात कांद्यातून मोठय़ा प्रमाणात नफा मिळाला असता. पण जमदाडे यांना लागणारी लॉटरी थाडक्यात चुकली.