प्रतिनिधी / पणजी
आर्थिक विकास महामंडळाकडून (ईडीसी) व्याज म्हणून सरकारला सुमारे रु. 12.80 कोटीचा धनादेश काल मंगळवारी देण्यात आला. महामंडळाचे अध्यक्ष सदानंद तानावडे यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे तो सुपूर्द केला.
आल्तिनो-पणजी येथील डॉ. सावंत यांच्या निवासस्थानी तानावडे यांनी सदर धनादेश डॉ. सावंत यांना दिला. ईडीसीला सुमारे रु. 52 कोटी नफा झाला असून त्याचा लाभांश लवकरच भागधारकांना देण्यात येणार आहे. ईडीसीचा कारभार इतर महामंडळांसाठी आदर्श असून त्यानुसार इतर महामंडळानी काम करावे, अशी सूचना डॉ. सावंत यांनी केली आहे. महामंडळे स्वयंपूर्ण स्वावलंबी झाली पाहिजेत तरच ती पुढे चालतील. त्या शिवाय त्या महामंडळानी तोटा संपवून नफ्याकडे वाटचाल करावी, असे ते म्हणाले.
राज्याच्या साधन सुविधांमध्ये संख्यात्मक वाढ होण्याच्या दृष्टीने आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. सरकारकडून भाग भांडवल म्हणून मिळालेल्या रकमेवर हे व्याज देण्यात आल्याची माहिती तानावडे यांनी दिली.