मध्यप्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये ‘क्वारंटाईन’ ः दक्षिण आफ्रिकेतून विशेष विमानाने दाखल
वृत्तसंस्था / ग्वाल्हेर, नवी दिल्ली
दक्षिण आफ्रिकेतून भारतात आणखी 12 चित्ते पोहोचले आहेत. या 12 चित्त्यांपैकी सात नर आणि पाच मादी आहेत. दक्षिण आफ्रिकेतून शुक्रवारी रवाना झालेले चित्ते शनिवार, 18 फेब्रुवारी रोजी मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर विमानतळावर दाखल झाले. तेथून त्यांना कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात आले आहे. भारताच्या महत्त्वाकांक्षी ‘चित्ता पुनः परिचय कार्यक्रमा’च्या (चित्ता रिइन्ट्रोडक्शन प्रोग्राम) अंतर्गत यापूर्वी 17 सप्टेंबर रोजी कुनोमध्ये नामीबियातून आणण्यात आलेल्या 8 चित्त्यांना सोडण्यात आले होते.
भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान जानेवारी महिन्यात चित्त्यांबद्दल करार झाला होता. करारानुसार पुढील 8-10 वर्षांसाठी दरवर्षी आणखी 12 चित्ते स्थानांतरित करण्याची योजना आहे. कराराच्या अटींची प्रासंगिकता निश्चित करण्यासाठी दर 5 वर्षांनी समीक्षा केली जाणार असल्याचे पर्यावरण मंत्रालयाकडून सांगण्यात आले. सध्या दक्षिण आफ्रिकेतून विशेष विमानाद्वारे 8 चित्त्यांना भारतात आणण्यात आले आहे. भारतीय हवाई दलाच्या सी-17 विमानामधून शनिवारी सकाळी 12 चित्ते मध्यप्रदेशातील ग्वाल्हेरला पोहोचले. त्यानंतर मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या हस्ते त्यांना नियोजित उद्यानात सोडण्यात आले आहे.
दक्षिण आफ्रिकेतील गौतेंग येथील ओआर टॅम्बो आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन हे 12 चित्ते शुक्रवारी संध्याकाळी भारतीय हवाई दलाच्या वाहतूक विमानातून रवाना करण्यात आले होते. हे विमान शनिवारी सकाळी ग्वाल्हेर विमानतळावर उतरले. त्यानंतर चित्त्यांना हेलिकॉप्टरने 165 किमी दूर असलेल्या कुनो राष्ट्रीय उद्यानात आणण्यात आले. यावेळी प्रसारमाध्यम प्रतिनिधींना उद्यानामध्ये प्रवेश देण्यात आला नव्हता.
‘कुनो’मध्ये आता एकूण 20 चित्ते
याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाला आठ चित्ते भारतात आणण्यात आले होते. 17 सप्टेंबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते चित्ते कुनो पार्कमध्ये सोडण्यात आले होते. त्यानंतर शनिवारी आफ्रिकेतून आणखी 12 चित्ते भारतात दाखल झाले आहेत. यामुळे आता कुनो नॅशनल पार्कमध्ये एकूण 20 चित्ते आहेत. यापूर्वी सप्टेंबरमध्ये दाखल झालेले 8 चित्ते दर 3-4 दिवसांनी एक शिकार करत असून त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे अधिकाऱयांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी एका मादी चित्त्याची प्रकृती बिघडली होती. तिच्यातील क्रिएटिनिनची पातळी वाढली होती, परंतु उपचारानंतर प्रकृती सुधारल्याचे सांगण्यात आले.
70 वर्षांपूर्वी भारतातून चित्ता नामशेष
भारतातून 70 वर्षांपूर्वी 1952 मध्ये चित्ता नामशेष झाला. अखेरच्या चित्त्याचा मृत्यू छत्तीसगढच्या कोरिया जिल्हय़ातील जंगलात झाला होता. चित्ता भारतातून पूर्णपणे विलुप्त होण्याचे मुख्य कारण अत्याधिक शिकार आणि अधिवासाची कमतरता हे आहे. नामशेष झालेले चित्ते पुन्हा भारतात आणण्याची तयारी काँग्रेस सरकारच्या काळात सुरू झाली होती. 1970 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी इराणहून भारतात चित्ते आणण्याची तयारी सुरू केली होती. ‘भारतातील वाघ तुम्हाला घ्या, त्या बदल्यात चित्ते आम्हाला द्या’ अशी ती ऑफर होती. इराणच्या शाहांशी इंदिरा गांधी यांनी करारावर सह्याही केल्या होत्या. पण इराणमध्ये सत्ताबदल झाल्यानंतर करार बारगळला होता. सद्यस्थितीत जगातील 7 हजार चित्त्यांपैकी बहुतांश दक्षिण आफ्रिका, नामीबिया आणि बोत्सवाना या देशांमध्ये आढळून येतात. चित्त्यांची सर्वाधिक संख्या नामीबियात आहे.