आरसीयूचा कारभार, विद्यार्थ्यांमधून नाराजी
प्रतिनिधी/ बेळगाव
राणी चन्नम्मा विद्यापीठाचा (आरसीयू) पदवीदान समारंभ लवकरच होणार आहे. परंतु या पदवीदान समारंभावेळी देण्यात येणाऱ्या पदवी प्रमाणपत्रासाठी प्रत्येक विद्यार्थ्याकडून 1200 रुपये वसूल केले जात आहेत. पदवी व पदव्युत्तर अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारणी केली जात असल्याने विद्यार्थ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
पदवीदान समारंभावेळी विद्यापीठाकडून पदवी प्रमाणपत्र दिले जाते. गुणपत्रिकेप्रमाणेच विद्यापीठाकडून पदवी प्रमाणपत्र देण्यात येते. केवळ पदवीदानादिवशी हे प्रमाणपत्र दिले जात असल्याने त्यासाठी 1200 रुपये मोजावे लागत आहेत. कर्नाटकातील एक मोठे विद्यापीठ म्हणून चन्नम्मा विद्यापीठाची नोंद आहे. बेळगाव, विजापूर व बागलकोट जिल्ह्यातील 418 मान्यताप्राप्त कॉलेज विद्यापीठांतर्गत येतात.
2010 मध्ये बेळगावमध्ये सुरू झालेल्या विद्यापीठाकडून प्रतिवर्षी फीमध्ये वाढ केली जात आहे. यामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे कठीण झाले आहे. मागील वर्षापासून आरसीयूने पदवीदानादिवशी प्रत्यक्षात प्रमाणपत्र देणे बंद केले आहे. केवळ सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते. मागीलवर्षी 1080 रुपये पदवीदान फी घेण्यात आली होती. यावर्षी मात्र ती 1200 रुपये करण्यात आली आहे.