चेन्नई / वृत्तसंस्था
चेन्नईमधून अंदमानला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे शुक्रवारी तांत्रिक बिघाडामुळे इमर्जन्सी (आपत्कालीन) लँडिंग करावे लागले. यावेळी विमानात 123 प्रवासी होते. या घटनेनंतर विमानात बसलेले सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर सुरक्षित असल्याची माहिती हवाई वाहतूक सूत्रांकडून देण्यात आली. टेक ऑफनंतर 60 मिनिटांनंतर त्यात तांत्रिक बिघाड झाला. सकाळी 8 वाजून 40 मिनिटांनी एअरबस-320 विमानाने उड्डाण केले होते. उड्डाणानंतर बऱयाचवेळाने तांत्रिक बिघाडाची बाब लक्षात आल्यानंतर पायलटने कंट्रोल रुमशी संपर्क साधत आपत्कालीन लँडिंग करण्याची परवानगी मागितली. त्यानंतर कंट्रोल रुममधून माघारी परतण्याची सूचना मिळताच जवळपास 9 वाजून 40 मिनिटांनी यशस्वी लँडिंग झाल्याने सर्व प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.