प्रतिनिधी / बेळगाव
शहर विकासाकरिता महात्मा गांधी शहर विकास योजनेंतर्गत महापालिकेला 125 कोटीचे अनुदान मंजूर केले आहे. यापैकी 111 कोटीची विकासकामे राबविण्याकरिता कृती आराखडय़ाला शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. या योजनेंतर्गत उपनगरातील विकासकामे राबविण्यासाठी प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे शहराच्या सभोवती असलेल्या तसेच अनधिकृत वसाहती म्हणून ओळखल्या जाणाऱया वसाहतींमधील विकासकामे राबविण्यात येणार आहेत.
यापूर्वी मुख्यमंत्री शहर विकास अनुदानांतर्गत प्रतिवषी 100 कोटीप्रमाणे महापालिकेला 400 कोटीचे अनुदान देण्यात आले होते. मात्र सदर अनुदानांतर्गत शहरातील विकासकामे राबविण्याची अट घालण्यात आली होती. तसेच अनधिकृत वसाहती आणि 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर बांधकाम करण्यात आलेल्या वसाहतींमधील विकासकामे राबविण्यास शासनाकडून मंजुरी देण्यात आली नाही. त्यामुळे नव्याने वसलेल्या वसाहतींमध्ये या योजनेंतर्गत विकासकामे राबविण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. परिणामी 400 कोटीच्या अनुदानांतर्गत केवळ शहरांतर्गत विकासकामे राबविण्यात आली होती. त्यामुळे शहरासभोवती निर्माण झालेल्या वसाहतींमधील समस्या जैसे थे होत्या. अनधिकृत वसाहतींमधील इमारतधारकांकडून दुप्पट कर आकारला जातो. पण सुविधा मात्र देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक वसाहतींमधील रस्ते, गटारीचे बांधकाम, डेनेज समस्या आणि पिण्याच्या पाण्याची समस्या रहिवाशांना भेडसावत आहे. मतदानाचा अधिकार आहे. मग नागरी समस्यांचे निवारण करण्यासाठी निधी का नाही? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत होता. तरी देखील अनधिकृत वसाहतींमधील समस्या मार्गी लागल्या नाहीत. मात्र महात्मा गांधी नगर विकास योजनेंतर्गत मंजूर झालेल्या 125 कोटी अनुदानामधून अनधिकृत वसाहतांमध्ये विकासकामे राबविण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. 111 कोटीचा कृती आराखडा तयार करण्यात आला असून दक्षिण आणि उत्तर भागातील उपनगरांच्या विकासाबरोबरच विविध कॉलन्यांमधील समस्यांचे निवारण करण्यासाठी विकासकामांचा समावेश करण्यात आला आहे.
विशेषत: आंबेडकरनगर, कलमेश्वर हौसिंग सोसायटी, राजारामनगर, मंगाईनगर, नाझर कॅम्प, आनंदनगर, सर्वोदय कॉलनी, संत रोहिदास कॉलनी, ब्रम्हनगर मजगाव, कनकदास कॉलनी, कणबर्गी येथील वाल्मिकी गल्ली, होळी गल्ली, शाहुनगर विनायक कॉलनी, दुर्गामाता गल्ली, नेहरुनगर अन्नपुर्णावाडी, बसवण कुडची, माळमारुती अशा विविध भागातील रस्ते, गटारींचे बांधकाम करण्याची कामे निधीअंतर्गत राबविण्यात येणार आहेत.
तसेच महापालिका हद्दीत येणाऱया काकती गावाजवळील परिसरातील रस्ते, नाल्यांचे बांधकाम आणि गटारी आदीसह श्रीराम कॉलनी, कुवेंपूनगर, बंजारा कॉलनी, ओमकारनगर, शाहुनगरमधील मुख्य रस्ता, कंग्राळी हद्दीतील मार्कंडेयनगर, दत्त गल्ली, वंदना कॉलनी, विजापूर कॉलनी, जुने गांधीनगर येथील दीपक गल्ली, उज्ज्वलनगर, वृंदावन कॉलनी, चंद्रमौली कॉलनी, कणबर्गी शेजारील भारत कॉलनी परिसरातील गटारींचे बांधकाम तसेच वीरभद्रनगर, न्यू वैभवनगर, कलमेश्वरनगर, अंजनेयनगर, अमननगर, मारुतीनगर, गजानन गल्ली, वॉर्ड नं. 2 मधील गावडे लेआऊट, गजानन नगर, देवेंदनगर, महावीरनगर, वॉर्ड नं. 3 मधील, लक्ष्मीनगर, विश्वकर्मा कॉलनी, गुरुकृपा कॉलनी, अनगोळ येथील पारिजात कॉलनी, साई श्रद्धा कॉलनी, वडगाव येथील केशवनगर, अन्नपुर्णेश्वरीनगर, संभाजीनगर, शिवगणेश कॉलनी, बाळकृष्णनगर, साई कॉलनी, नेकार कॉलनी, लक्ष्मीनगर, नरगुंदकर कॉलनी, नाथ पै नगर, जाधवनगर, विद्यानगर, गजानन महाराज नगर, टिळकवाडी, नानावाडी गिंडे कॉलनी, भवानीनगर, गुरुवार पेठ, देशमुख रोड, वॉर्ड नं. 22 मधील गायत्रीनगर, जोशी मळा अशा विविध उपनगरांतील समस्यांचे निवारण करण्यासाठी गटारींचे बांधकाम आणि रस्त्यांचा विकास करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.
यापूर्वी या कॉलन्यांमधील समस्यांचे निवारण करण्यासाठी स्थानिक रहिवाशांसह नगरसेवकांनी व लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले होते. पण महापालिकेकडे निधी उपलब्ध नसल्याने विकासकामे मार्गी लागली नाहीत. तसेच शहरातील अधिकृत परिसराचा विकास करण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे महात्मा गांधी नगरविकास योजनेंतर्गत राबविण्यात येणाऱया निधीचा विनियोग अनधिकृत वसाहतींमध्ये करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळेच अनधिकृत आणि अधिकृत वसाहतीमधील समस्यांचे निवारण होणार आहे.