विजय पाठक / जळगाव :
128 farmers suicide in Jalgaon district जळगाव जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येचे प्रमाण हे दरवषी वाढत असून, या आत्महत्या चिंताजनक ठरत आहेत. 2021 मध्ये ऑगस्टअखेर 92 शेतकरी आत्महत्या झाल्या तर यंदा 2022 मध्ये याच कालावधीत 128 आत्महत्या नांदवल्या गेल्या. विशेष म्हणजे विशिष्ट तालुक्यात या आत्महत्या होत आहेत. जिल्हा प्रशासनाकडे मात्र तालुकावार आत्महत्येची माहिती उपलब्ध नाही. 2001 ते 2022 ऑगस्टअखेर जिल्ह्यात तब्बल 2196 शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत.
2021 मध्ये देशात 1 लाख 64 हजार 33 शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली. यात महाराष्ट्रात 22,207 आत्महत्या नोंदवल्या गेल्या. पूर्वी विदर्भात शेतकरी आत्महत्या मोठया प्रमाणावर होत होत्या. नंतर या रांगेत जळगाव जिल्ह्याचे नाव येऊ लागले. 2001 मध्ये जिल्ह्यात 9, 2002 मध्ये 2, 2003 मध्ये 1 आत्महत्या नोंदवली गेली. 2004 मध्ये 25 तर 2005 मध्ये 24 आत्महत्या नोंदवल्या गेल्या. या पाच वर्षात 61 आत्महत्या झाल्या. 2006 ते 10 या काळात 356, 2011 ते 15 या काळात 669 तर 2016 ते 21 या काळात 982 आत्महत्या झाल्या.
अधिक वाचा : महाराष्ट्रात पुढील पाच दिवस पावसाचे
2014 पासून हा जिल्ह्यातील आत्महत्यांचा आलेख चढता आहे. 2014 मध्ये 174, 2015 मध्ये 190, 2016 मध्ये 171, 2017 मध्ये 151, 2018 मध्ये 148 तर 2019 मध्ये 196 आणि 2020 मध्ये 141 आणि 2021 मध्ये 175 शेतकरी आत्महत्या नोंदवल्या गेल्या. 2021 मध्ये ऑगस्ट अखेर 92 तर 2022 मध्ये याच कालावधीत 128 आत्महत्यांची नोंद झाली आहे. अशा रितीने 2001 पासून ऑगस्ट 22 अखेर जिल्ह्यात 2196 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत.