बारावीचा ऑनलाईन निकाल जाहीर : यंदाही मुलींचीच बाजी : राज्यात कोल्हापूर पाचव्या स्थानावर : यंदा निकालात 4.60 टक्केंनी घट : कोल्हापूर विभागात कोल्हापूर 96.41 टक्के गुण मिळवत प्रथम, सातारा 94.23 टक्के गुण मिळवत व्दितीय तर सांगली 93.91 टक्के गुण मिळवत व्दितीय
प्रतिनिधी/ कोल्हापूर
पुणे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बुधवारी बारावीचा निकाल ऑनलाईन जाहीर केला. यामध्ये राज्याचा 92.22 टक्के तर कोल्हापूर विभागाचा निकाल 95.7 टक्के निकाल लागला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने नियम अटींसह आपआपल्या कनिष्ठ महाविद्यालयातच ऑफलाईन परीक्षा घेण्यात आली होती. गतवर्षी ऑनलाईन परीक्षेमुळे निकालात फुगवटा झाला होता. गतवर्षीच्या निकालाशी तुलना करता यंदा कोल्हापूर विभागाच्या निकालात 4.60 टक्केंनी घट झाली आहे. गतवर्षी कोल्हापूर विभाग राज्यात चवथ्या तर यंदा पाचव्या स्थानावर असल्याने निकालात झालेली घसरण चिंता वाढवणारी आहे. परंतू यंदाही बारावीच्या निकालात मुलींनीच बाजी मारली आहे, अशी माहिती कोल्हापूर विभागीय मंडळाचे प्रभारी सचिव डी. एस. पोवार आणि शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोल्हापूर विभागाचा बारावीचा निकाल 95.7 टक्के लागला आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्हय़ाचा निकाल 96.41 टक्के लागला असून विभागात प्रथम क्रमांक आहे. तर सातारा जिल्हय़ाचा निकाल 94.23 टक्के लागला असून विभागात व्दितीय तर सांगली जिल्हय़ाचा निकाल 93.91 टक्के लागला असून विभागात तृतीय क्रमांक मिळवला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी परीक्षा न झाल्याने दहावी, अकरावी आणि बारावीच्या अंतर्गत गुणांच्या आधारे गुणदान करण्यात आले होते. त्यामुळे गतवर्षी 7.25 टक्केंनी निकालात वाढ झाली होती. यंदा मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने 75 टक्के अभ्यासक्रमावर बारावीची परीक्षा ऑफलाईन पध्दतीने झाली. कोरोनात विद्यार्थ्यांचा लिखानाचा सराव कमी झाल्याने पेपर कव्हर झाला नाही. ऑनलाईन शिक्षण घेण्यास अडचणी आल्या. त्यामुळे कोल्हापूर विभागाचा निकाल गतवर्षीपेक्षा 4. 60 टक्केनी घसरला आहे.
कोल्हापूर विभागातून 844 कनिष्ठ महाविद्यालयांतील 1 लाख 21 हजार 340 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी 1 लाख 15 हजार 362 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर 6 हजार 564 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये आयटीआयच्या विद्यार्थ्यांचा समावेश असून यांची लवकरच पुर्नपरीक्षा घेतली जाणार आहे. जे विद्यार्थी मिळालेल्या गुणांवर समाधानी नसतील त्यांनी 10 ते 20 जून या कालावधीत गुण पडताळणीसाठी विहीत नमुन्यात शुल्कासह अर्ज करावयाचा आहे. उत्तरपत्रिका छायांकित प्रतीसाठी 10 ते 29 जून पर्यंत विहीत नमुन्यात अर्ज करावयाचा आहे.
राज्यासह कोल्हापूर विभागातही मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण अधिक आहे. मुलांची उत्तीर्णतेची संख्या 61 हजार 200 असून त्याचे प्रमाण 93.26 टक्के आहे. तर मुलींच्या उत्तीर्णतेची संख्या 54 हजार 162 असून त्याचे प्रमाण 97.20 टक्के आहे. म्हणजेच मुलींच्या उर्त्तीर्णतेचे प्रमाण विभागात मुलांच्या तुलनेत 3.94 इतके अधिक आहे. संबंधीत निकालासंदर्भात विद्यार्थ्यांची तक्रार असल्यास त्यांनी कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळाशी संपर्क साधावा, असे आवाहन कोल्हापूर विभागीय मंडळाचे प्रभारी सचिव डी. एस. पोवार यांनी केले आहे. यावेळी सांगली माध्यमिक शिक्षणाधिकारी एम. एस. गायकवाड, सातारा माध्यमिक उपशिक्षणाधिकारी रविंद्र खंदारे, लेखाधिकारी एस. एल. रेणके, प्रभारी सहाय्यक सचिव एस. एस. कारंडे, वरिष्ठ अधिक्षक एस. वाय. दुधगावकर, सहाय्यक अधिक्षक व्ही. पी. पाटील, वरिष्ठ लिपिक रवी शिंगाडे आदी उपस्थित होते.
कोल्हापूर विभागातील 210 खेळाडूंना मिळाले सवलतीचे गुण
बारावीच्या परीक्षेला बसलेल्या खेळाडूंना नियमांच्या अधीन राहून सवलतीचे गुण देण्यात आले आहेत. सातारा 57, सांगली 52 आणि कोल्हापूर 101 अशा 210 विद्यार्थ्यांना क्रीडाचे गुण देण्यात आले. यामध्ये जिल्हा, विभागीय, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंचा समावेश आहे.
कोल्हापूर विभागाचा निकाल (नियमित विद्यार्थी)
जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय प्रविष्ठ विद्यार्थी उत्तीर्ण विद्यार्थी टक्केवारी
सातारा 251 36539 34434 94.23
सांगली 272 33201 31189 93.91
कोल्हापूर 321 51600 49748 96.41
एकूण 844 1213350 115362 95.07