पंजाबमधील शेतकऱयांसमोर संकट : प्रशासनाने उचलली पावले
वृत्तसंस्था/ भटिंडा
पंजाबच्या फाजिल्का जिल्हय़ात तीन किलोमीटर रुंद आणि एक किलोमीटर लांबीच्या टोळधाडीने पिकांवर आक्रमण केले आहे. शेतकऱयांच्या पिकांवर घोंगावणारे संकट पाहता राज्य सरकारच्या विविध विभागांकडून 13 तास मोहीम राबवून हे आक्रमण परतविण्यात आले आहे. राजस्थान आणि पाकिस्तानात नुकसान घडवून आणल्यावर ही टोळधाड पंजाबमध्ये शिरली आहे. मागील काही दिवसांपासून क्षेत्रात टोळधाड दिसून आली होती. पण पंजाबमध्ये एवढय़ा मोठय़ा प्रमाणात टोळधाडीचे आक्रमण पहिल्यांदाच घडले आहे.
टोळधाडीने फाजिल्काच्या बकेनवाला आणि रुपनगर गावात प्रवेश केला होता. ही गावे राजस्थान आणि पाकिस्तान सीमेनजीक आहेत. टोळधाडीने त्रस्त शेतकऱयांनी कृषी विभागाशी संपर्क केला होता. टोळधाडीमुळे पिकांचे कुठल्याच प्रकारे नुकसान झालेले नाही आणि कुठल्याही प्रकारचा धोका निष्प्रभ करण्यात आल्याचा दावा कृषी विभागाच्या अधिकाऱयांनी केला आहे. कृषी विभागाने पंजाब कृषी विद्यापीठ, बीएसएफ, अग्निशमन विभाग, पोलीस, नागरी प्रशासन, हॉर्टिकल्चर आणि शेतकऱयांच्या मदतीने ही मोहीम राबविली आहे.
400-500 टन किटकनाशकाचा वापर
टोळधाडींचे संकट नष्ट करण्यासाठी सुमारे 400 ते 500 टन किटकनाशकांचा वापर करण्यात आला आहे. पाकिस्तानमधून ही टोळधाड पंजाबमध्ये दाखल झाली होती, अशी माहिती कृषी विभागाचे संचालक स्वतंत्र कुमार यांनी दिली आहे. टोळधाडींच्या उच्चाटनासाठी बूमर स्प्रे, ट्रक्टर माउंटेड हाय व्हेलॉसिटी स्प्रे आणि अग्निशमन विभागाच्या वाहनाचा वापर करण्यात आल्याचे राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव विश्वजीत खन्ना यांनी सांगितले आहे.
टोळधाडीचा मुद्दा संसदेत उपस्थित
राजस्थानसह काही राज्यांमध्ये पाकिस्तानमधून येणाऱया टोळधाडीमुळे होणाऱया पिकांच्या नुकसानीचा मुद्दा लोकसभेत मंगळवारी उपस्थित झाला. केंद्र सरकारने पथक नेमले असून लवकरच संबंधित क्षेत्रांची पाहणी केली जाणार असल्याचे संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सांगितले आहे. टोळधाडीमुळे राजस्थान, गुजरातसह अन्य राज्यांमधील 6274 गावांमधील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.