पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा – फाळणीचे दुःख विसरू शकत नसल्याची भावना
नवी दिली / वृत्तसंस्था
भारतात 14 ऑगस्ट हा ‘फाळणी वेदना स्मृती दिन’ अर्थात ‘विभाजन विभीषिका स्मृती दिवस’ म्हणून पाळणार अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. फाळणीचे दुःख आणि वेदना आपण कधीच विसरू शकत नाही. यातूनच तिरस्काराची आणि अविश्वासाची भावना कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला. या दुःखद गोष्टींची आठवण मनात राहिली तरच स्वातंत्र्याचे मोल समजेल, असे सांगत पंतप्रधान मोदी यांनी 14 ऑगस्ट हा फाळणी दिन म्हणून पाळणार असल्याचे जाहीर केले.
14 ऑगस्ट 1947 रोजी ‘ब्रिटिश इंडिया’ची फाळणी झाली आणि पाकिस्तान या देशाची निर्मिती झाली. यानंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी पारतंत्र्य संपले आणि भारत स्वतंत्र झाला. पण फाळणीच्या काही दिवस आधी आणि नंतरही भारत-पाकिस्तान सीमेवर नागरिकांची पळापळ सुरू होती. फाळणीनंतर झालेल्या दंगलींमध्ये अनेकांचे प्रचंड नुकसान झाले, कित्येकजण बेघर झाले. फाळणीचा सर्वाधिक फटका महिला आणि मुलांना बसला. फाळणीमुळे लोकांच्या मनात एकमेकांविषयी तिरस्काराची आणि अविश्वासाची भावना निर्माण झाली. या सर्व घटना विसरायच्या म्हटल्या तरी विसरता येणार नाहीत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
दरवषी 14 ऑगस्ट रोजी पाकिस्तानच्या जवानांनी भारतीय जवानांना आणि 15 ऑगस्ट रोजी भारताच्या जवानांनी पाकिस्तानच्या जवानांना मिठाईचे वाटप करण्याची पद्धत पंजाबमध्ये अटारी (भारत) – वाघा (पाकिस्तान) सीमेवर पाळली जाते. पण भारतात फाळणी दिन पाळण्याच्या निमित्ताने पहिल्यांदाच विविध अंगांनी चर्चा होऊ शकते. संपूर्ण देशभरात भारताचा स्वातंत्र्यदिन मोठय़ा उत्साहात साजरा करण्याची तयारी सुरु असतानाच पंतप्रधानांनी ही महत्त्वाची घोषणा केली आहे.