तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांकडून केंद्राला हस्तक्षेपाचे आवाहन
वृत्तसंस्था/ चेन्नई
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी विदेश मंत्री एस. जयशंकर यांना पत्र लिहून राज्याच्या 14 मच्छिमारांना श्रीलंकेकडून अटक करण्यात आल्याचे कळविले आहे. सर्व मच्छिमार आणि त्यांच्या नौकांच्या तत्काळ मुक्ततेसाठी तसेच श्रीलंकेकडून ठोठावण्यात येणारा दंड माफ करण्यासाठी पावले उचलण्याचे आवाहन स्टॅलिन यांनी जयशंकर यांना केले आहे.
श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांकडून भारतीय मच्छिमारांना ताब्यात घेण्यायच घटनांमध्ये चिंताजनक स्वरुपात वाढ झाली आहे. 7 सप्टेंबर रोजी पुदुक्कोट्टई जिल्ह्यातील 14 मच्छिमारांना अटक करण्यात आली अून त्यांच्या तीन यांत्रिक मासेमारी नौका जप्त करण्यात आल्या आहेत असे स्टॅलिन यांनी नमूद केले आहे.
सप्टेंबरपर्यंत 350 मच्छिमारांना अटक
चालू वर्षात (7 सप्टेंबरपर्यंत) श्रीलंकेच्या नौदलाने 350 मच्छिमार आणि 49 नौका ताब्यात घेतल्या आहेत. मागील 6 वर्षांमध्ये हे प्रमाण सर्वाधिक ठरले आहे. श्रीलंकेच्या ताब्यात असलेले सर्व मच्छिमार आणि त्यांच्या नौकांची मुक्तता सुनिश्चित करण्यासाटी तत्काळ आणि ठोस कूटनीतिक पावले उचलण्याचे आवाहन स्टॅलिन यांनी पत्राद्वारे विदेश मंत्र्यांना केले आहे.
श्रीलंका न्यायालयांकडून मोठा दंड
श्रीलंकेतील न्यायालयांकडून या मच्छिमारांना मोठा दंड ठोठावला जात आहे. हा दंड भरणे या मच्छिमारांना शक्य नाही. यामुळे मच्छिमारांवर ठोठावण्यात आलेला दंड माफ करविण्यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा असे स्टॅलिन यांनी पत्रात म्हटले आहे. दंड भरता न आल्याने मच्छिमारांना दीर्घकाळापर्यंत तुरुंगवास भोगावा लागतो आणि यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना संकटाला तोंड द्यावे लागत असल्याचे स्टॅलिन यांनी स्वत:च्या मागील पत्रात नमूद पेले होते