राज्य सरकारकडून चौकशीचे आदेश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली सरकारच्या शेल्टर होम ‘आशा किरण’मध्ये राहणाऱ्या 14 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणाची माहिती मिळाल्यावर अरविंद केजरीवाल सरकारने न्यायदंडाधिकाऱ्यांच्या मार्फत चौकशीचे आदेश देत 48 तासांत अहवाल मागविला आहे.
दिल्लीच्या रोहिणी येथील सरकारी निवारागृह आशा किरणमध्ये जानेवारीपासून आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी दिल्लीच्या मंत्री आतिशी यांनी अतिरिक्त मुख्य सचिवांना तत्काळ चौकशी सुरु करण्याचा आणि 48 तासांच्या आत अहवाल सोपविण्याचे निर्देश दिले आहेत. या मृत्यूंसाठी जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विरोधात कारवाईची शिफारस करण्याचा निर्देशही त्यांनी दिला आहे. तसेच भविष्यात अशाप्रकारच्या घटना रोखण्यासाठी उपाययोजन सुचविण्यास सांगण्यात आले आहे. राजधानी दिल्लीत असा प्रकार घडणे धक्कादायक आहे. हा एक अत्यंत गंभीर मुद्दा असून याप्रकरणी सखोल चौकशी होणे गरजेचे असल्याचे आतिशी यांनी म्हटले आहे. निवारागृहात मृत्युमुखी पडलेल्या बहुतांश लोकांचे वय 20-30 वर्षांदरम्यान होते.