विजय जाधव/ गोडोली
ग्रामविकास विभागाने ग्रामसभांना स्थगिती दिली असताना नियोजन विभागाने रोजगार हमी योजनेचे लेबर बजेटला ग्रामसभा घेऊन मान्यता घेण्याचा फतवा काढला आहे. ग्रामविकास विभागाने सोशल मिडियाचा वापर करून महिलांच्या अडचणी सोडविण्यासाठी ग्रामपंचायतींना ग्रामविकास विभागाने आदेश देत विशेष महिला ग्रामसभा घेऊ नका, असा आदेश जारी केली आहे. पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने ग्रामसभा घेऊन गाव ओडीएफ प्लस दर्जा जाहीर करण्यास सांगितले आहे. ग्रामसभा घ्यायच्या की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. ग्रामसभा घेतली नाही तर सरपंच, ग्रामसेवकांवर कारवाई होऊ शकते. सभा घेतली तर आणि नाही घेतली तर कारवाई होणार की नाही, असा संभ्रम वाढला आहे.
राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक कोण याचा तिढा अद्याप सुटला नाही. तर कोरानाच्या धास्तीने ग्रामसभांना पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. वर्षात चार ग्रामसभा घेणे ही सरपंचांची कर्तव्य असून पैकी एक सभा घेण्यात सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांच्यापैकी कसूर करणाऱयांवर कारवाई होऊ शकते. गावातील विकास कामांच्या नियोजनापासून अंमलबजावणीसाठी ग्रामसभा होत नसल्याने खिळ बसली आहे. पंचायत राज व्यवस्थेतील ग्रामसभांचे महत्व अनन्य साधारण असून त्या होत नसल्याने ग्रामपंचायतीच्या कामकाजात अडचणी वाढत आहेत.
लेबर बजेट आराखडा
ग्रामविकास विभागाने 15 ऑगस्टची ग्रामसभा बंधनकारक नसल्याचा आदेश निर्गमित केला आहे. तर ग्रामविकास विभागाच्या परवानगी शिवाय इतर विभागांनी ग्रामसभांचे आयोजन करू नये, असा शासनाने यापुर्वी आदेश दिले आहेत. तरी ही 5 ऑगस्ट रोजी नियोजन विभागाने रोजगार हमी योजनेच्या लेबर बजेटच्या आराखडय़ाचे वाचन, पुरक आराखडा घेण्यासाठी 15 ऑगस्ट रोजी ग्रामसभा घेण्याचे आदेश दिले आहेत.
गंधगी मुक्त अभियान
पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने दि. 6 ऑगस्ट रोजी परिपत्रक काढून गंधगी मुक्त अभियान राबवण्यासाठी ग्रामसभा आयोजित करण्यास सांगितले आहे. दि.8 ते 15 ऑगस्ट विविध कार्यक्रम राबवून दि. 15 ऑगस्ट रोजी ग्रामसभा आयोजित करून गाव ओडीएफ प्लस दर्जाबाबत घोषणा करण्याचा फतवा काढला आहे.
महिलांसाठी सोशल मिडीया
ग्रामविकास विभागाने दि. 15 ऑगस्ट रोजी विशेष महिला ग्रामसभा न घेता महिलांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी ग्रामपातळीवर डिजीटल तंत्रज्ञानाचा वापर करावा, असा दि. 6 ऑगस्ट रोजी आदेश दिला आहे. मोबाईल, इमेलव्दारे सरपंच, ग्रामसेवक, कर्मचाऱयांनी महिलांच्या तक्रारी प्राप्त करून त्याचे निराकरण गावपातळीवर करा, असे स्पष्ट आदेश दिले आहेत.
ग्रामसभा होंणार की नाही
दि.15 ऑगस्ट रोजी ग्रामसभा घेण्यावरून ही विविध विभागात समन्वयाचा अभाव उघड झाला आहे. कोरोना संसर्गाला रोकण्यासाठी अमुल्य योगदान देणाऱया ग्रामसेवक, सरपंचांची चांगलीच दमछाक झाली आहे. अन्य विभागातील अधिकारी,कर्मचाऱयांचे या लढयात आधीच सहभाग कमी असून ते खुर्चीत बसून फक्त आदेश देण्यात माहीर असल्याचे समोर आले आहे.त्यामुळे 15 ऑगस्टला ग्रामसभा होणार की नाही,याबाबत संभ्रम वाढला आहे.याबाबत नव्याने आदेश जारी होणार की सभ्रम कायम राहणार,याची उत्सुकता लागली असल्याचे सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र भोसले यांनी तरूण भारत शी बोलताना सांगितले.