उच्च शिक्षणमंत्री डॉ. अश्वथ नारायण यांची कुलगुरुंना सूचना : एनआयआरएफच्या मानांकनासंबंधी सूचना
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यातील सर्व विद्यापीठे, महाविद्यालयांनी नॅकची मान्यता आणि एनआयआरएफ मानांकन मिळविण्यासाठी 15 दिवसांत कृती आराखडा सादर करावा, अशी सूचना उपमुख्यमंत्री तथा उच्च शिक्षणमंत्री डॉ. अश्वथ नारायण यांनी दिली आहे. राज्यात उच्च शिक्षण विभागात नवे राष्ट्रीय धोरण जारी करण्याच्या दिशेने राज्य सरकारने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून मानांकनासाठी कृती आराखडा त्वरित सादर करण्याचे आदेश विद्यापीठ-महाविद्यालयांना देण्यात आले आहेत.
उच्च शिक्षणमंत्री डॉ. अश्वथ नारायण यांनी मंगळवारी राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरुंची बैठक घेतली. याप्रसंगी नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी, प्रत्येक विद्यापीठाला मानांकन आणि प्रत्येक महाविद्यालयाला नॅकची मान्यता मिळालेली असावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
आपल्याला जागतिक पातळीवर होणाऱया शैक्षणिक बदलाच्या प्रवाहासोबत जाणे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्या विद्यापीठांनी आवश्यक ते बदल करावेत, त्याकरिता नव्या शैक्षणिक धोरणाचा अंमल करावा, जागतिक पातळीवर मान्यता आणि मानांकन आवश्यक असल्याचा सल्ला डॉ. अश्वथ नारायण यांनी कुलगुरुंना याप्रसंगी दिला.
तीन वर्षाची योजना तयार करा
पुढील तीन वर्षात विद्यापीठ कार्यक्षेत्रात कोणकोणते कार्यक्रम-उपक्रम हाती घेणार, एनआयआरएफचे मानांकन आणि नॅकची मान्यता मिळविण्यासाठी कोणत्या प्रकारची तयारी करण्यात येईल, यासंबंधीचा विस्तृत कृती आराखडा पुढील बैठकीत सादर करावा, अशी सूचना त्यांनी कुलगुरुंना दिली आहे.
एनआयआरएफचे मानांकन व नॅकची मान्यता मिळविण्यासंबंधी कोणत्याही कारणास्तव दुर्लक्ष करू नये. जागतिक स्तरावरील शिक्षण संस्थांशी करार करण्यासाठी आणि अधिक अनुदान मिळविण्यासाठी हे आवश्यक आहे. राज्यातील भारतीय विज्ञान संस्था एनआयआरएफच्या मानांकन यादीत अग्रस्थानी आहे. म्हैसूर विद्यापीठ 27 व्या स्थानी तर बेंगळूर विद्यापीठ 68 व्या, शिमोग्यातील कुवेंपू विद्यापीठ 73 व्या आणि बेळगावमधील चन्नम्मा विद्यापीठ 80 व्या स्थानावर आहे. पुढील वेळेस मानांकन यादीत म्हैसूर विद्यापीठ 20 व्या तर बेंगळूर विद्यापीठ 50 च्या आतील स्थानावर असावे, असे त्यांनी सांगितले. तुमकूर आणि मंगळूर विद्यापीठे मानांकन यादीत 150 च्या आत आहेत. उर्वरित कोणत्याही विद्यापीठांना हे मानांकन मिळालेले नाही. अध्यापन, अध्ययन, संशोधन आणि व्यावसायिकता, निकाल आदी पाच आधार मानून एनआयआरएफ मानांकन देण्यात येते, असेही ते यावेळी म्हणाले.