प्रतिनिधी / बेंगळूर
कोरोना नियंत्रणासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असलेल्या मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी आता राज्यातील विकासकामांवरही लक्ष केंद्रीत केले आहे. प्रशासकीय कामकाजाला गती देण्याबरोबरच विकासकामांची पाहणी करण्यासाठी 15 दिवसातून एकदा जिल्हा दौरा करणार असल्याची माहिती येडियुराप्पा यांनी दिली आहे.
बेंगळूरमध्ये पत्रकारांशी ते बोलत होते. यापुढे प्रत्येक जिल्हय़ाला भेट देऊन विकासकामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात येईल. आजपासूनच हे काम आपण हाती घेतले आहे. 15 दिवसांतून एकदा प्रत्येक जिल्हय़ाला भेट देण्यात येईल, असे त्यांनी बोलताना सांगितले. शुक्रवारपासून विविध जिल्हय़ांचा दौरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, कोरोना परिस्थितीमुळे सर्वच जिल्हय़ांचा दौरा करणे आपल्याला शक्य झाले नाही. मात्र, व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनांशी सातत्याने संपर्क साधून कोरोना परिस्थितीची माहिती घेतली आहे. आता विविध जिल्हय़ांना भेटी देऊन तेथील परिस्थितीचे प्रत्यक्षात अवलोकन करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.