कोल्हापूर/प्रवीण देसाई
संभाव्य पुरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी जिह्यात नियुक्त केलेल्या राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दला (एनडीआरएफ) च्या दोन पथकांच्या भोजन व प्रवासासाठी राज्य सरकारने 15 लाख रूपयांचा निधी मंजूर केला आहे. कोल्हापूर शहर व शिरोळ तालुक्यात ही पथके तैनात आहेत. नुकताच राज्य शासनाने याबाबतचा निर्णय घेऊन हा निधी जिल्हा प्रशासनाला उपलब्ध करुन दिला आहे.
राज्यात ठिकठिकाणी जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे संभाव्य पूरस्थिती निर्माण होऊ शकते. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दक्षता म्हणून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) ची 9 पथके 15 सप्टेंबरपर्यत नियुक्त केली आहेत. तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची 2 पथके 15 जूनपासून 15 सप्टेंबरपर्यत विविध जिह्यांमध्ये नियुक्त केली आहेत. त्यानुसार कोल्हापूर जिह्यासाठी ‘एनडीआरएफ’ची दोन पथके यापूर्वीच दाखल झाली आहेत. ही पथके सध्या कोल्हापूर शहर व शिरोळ तालुक्यात तैनात असून यंमध्ये 50 जवान व बोटींसह विविध यंत्रसामुग्रीचा समावेश आहे.
पथकांच्या तैनातीदरम्यान त्यांच्या भोजन व प्रवास खर्चासाठी संबंधित जिह्यांना निधी उपलब्ध करुन देण्याचा विचार राज्य सरकारकडून सुरु होता. त्यानुसार संबंधित 10 जिह्यांसाठी प्रत्येकी 15 लाख रुपये याप्रमाणे 2 कोटी 65 लाख रुपये निधी मंजूर केला आहे. यामध्ये कोल्हापूर जिह्यासह सातारा, पुणे, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर, नांदेड व गडचिरोली जिह्यांचा समावेश आहे. हा निधी विभागीय आयुक्तांमार्फत संबंधित जिल्हय़ांना उपलब्ध करुन दिला आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून या निधीचा विनियोग जिह्यात कार्यरत ‘एनडीआरएफ’च्या पथकांसाठी होणार आहे. पूरस्थिती काळात निधीअभावी मदतकार्य थांबू नये, तसेच या निधीचा बोजा जिल्हा प्रशासनावर पडू नये, यासाठी सरकारकडून ही आर्थिक तरतूद केल्याचे दिसत आहे.