वृत्तसंस्था /चेंगवॉन (द. कोरिया)
आयएसएसएफ विश्वचषक चेंगवॉन 2022 नेमबाजी स्पर्धेत भारताने 15 पदकांची कमाई करत आघाडीचे स्थान मिळविले. बुधवारी या स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी पुरुषांच्या 25 मी. रॅपिड फायर पिस्तुल सांघिक नेमबाजी प्रकारात भारताच्या अनिश बनवाला, विजयवीर सिद्धू आणि समीर यांनी रौप्यपदक पटकाविले.
या स्पर्धेमध्ये पदक तक्त्यात भारताने पहिले स्थान मिळविताना 5 सुवर्ण, 6 रौप्य आणि 4 कास्य अशी एकूण 15 पदकांची कमाई केली. या स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी यजमान दक्षिण कोरियाने एकमेव कास्यपदक मिळविले असून त्यांनी या स्पर्धेत 4 सुवर्ण, 5 रौप्य आणि 3 कास्य पदके घेतली आहेत. पुरुषांच्या 25 मी. रॅपिड फायर पिस्तुल सांघिक नेमबाजी प्रकारातील सुवर्णपदकासाठी झालेल्या फेरीमध्ये भारतीय नेमबाजांनी 872 गुणांसह दुसरे स्थान मिळविले. या क्रीडा प्रकारात झेकच्या नेमबाजांनी सुवर्णपदक पटकावले.
मिश्र सांघिक स्कीट प्रकारात भारताच्या मिराज अहमद खान आणि जेहरा मुफादल दिसवाला यांची कामगिरी समाधानकारक न झाल्याने भारताला या क्रीडा प्रकारात नवव्या स्थानावर समाधान मानावे लागले. 2022 च्या कालावधीत आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेमध्ये भारतीय नेमबाजांनी आतापर्यंत दोन स्पर्धांमध्ये पदक तक्त्यात पहिले स्थान मिळविले आहे. कैरोमध्ये यापूर्वी झालेल्या स्पर्धेत भारताने 4 सुवर्णपदकांची कमाई करत आघाडी मिळविली होती.