तिरंगा हातात घेत 50 किमीची पदयात्रा
वृत्तसंस्था/ बिकानेर
राजस्थानचे शिक्षणमंत्री डॉ. बी.डी कल्ला यांचा जिल्हा असलेल्या बिकानेरमध्ये शिक्षकांच्या कमतरतेला तोंड देत असलेल्या सुमारे 150 विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी मोठे पाऊल उचलल्यावर शिक्षण संचालनालय हादरून गेले. हे विद्यार्थी शिक्षकांच्या नियुक्तीच्या मागणीसह मंगळवारी गावातून हातात तिरंगा घेऊन पायी प्रवास करत शिक्षण संचालनालयाच्या दिशेने रवाना झाले हेते. या विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी सुमारे 50 किलोमीटरची पायपीट करत बिकानेर गाठले. या पदयात्रेमुळे हादरलेल्या शिक्षण विभागाच्या अधिकाऱयांनी ताबडतोब शाळेत मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापकासह अन्य चार शिक्षकांची नियुक्ती करण्याचा आदेश काढला आहे.
बिकानेर जिल्ह्य़ात सोढवाली गाव असून यात उच्च माध्यमिक शाळेत शिक्षकांची कमतरता आहे. 500 हून अधिक विद्यार्थी असलेल्या शाळेत शिक्षकांची 14 पदे रिक्त आहेत. शाळेत मुख्याध्यापक अन् उपमुख्याध्यापक पदच रिक्त आहे. शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला फटका बसत आहे. यामुळे विद्यार्थी तसेच ग्रामस्थांमध्ये रोष होता.
विद्यार्थी अन् ग्रामस्थ शिक्षकांच्या मागणीवरून मागील 6 दिवसांपासून शाळेला टाळे ठोकून निदर्शने करत होते. परंतु शिक्षण विभागाने याची दखल घेतली नव्हती. यामुळे विद्यार्थी अन् ग्रामस्थांनी शिक्षण संचालनालयाच्या दिशेने कूच करण्याचा निर्णय घेत त्यावर अंमलबजावणी केली. याची माहिती मिळताच शिक्षण विभागाच्या अधिकाऱयांमध्ये खळबळ उडाली. शिक्षण मंत्र्यांना याची कुणकुण लागताच त्यांनी रिक्त पदे भरण्याचे निर्देश दिले.