ऑनलाईन टीम / तरुण भारत :
गेल्या नऊ महिन्यांपासून युक्रेन आणि रशियामध्ये भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धात शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. युद्धामुळे लाखो भारतीयांनी हा देश सोडला आहे. पण अजुनही 1500 विद्यार्थी युक्रेनमध्येच आहेत. त्यांनी भारतात येण्यास नकार दिला आहे. इथेच शिकू नाहीतर मरू अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
युक्रेनमध्ये युद्धजन्य परिस्थितीमुळे संघर्ष वाढला आहे. 19 ऑक्टोबर रोजी युक्रेनमधील भारतीय दूतावासाने एक ॲडव्हायजरी जारी केली असून, युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना तातडीने देश सोडण्यास सांगितले आहे. परंतु येथील 1500 विद्यार्थ्यांनी भारतात माघारी परतण्यास नकार दिला आहे. हे विद्यार्थी भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत नाहीत. त्यांना युक्रेनमध्ये राहून आपले शिक्षण पूर्ण करायचे आहे.
अधिक वाचा; राज्याराज्यात निकोप स्पर्धा हवी : शिवराजसिंह चौहान
या विद्यार्थ्यांचा आरोप आहे की, भारत सरकारने त्यांना कोणताही पर्याय सोडला नाही. यातील काही विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेत आहेत. युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांच्या भविष्यातील अभ्यासाबाबत सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे. यावर 1 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. हे विद्यार्थीही त्याची वाट पाहत आहेत.