वृत्तसंस्था / नवी दिल्ली
कोरोनाच्या दुसऱया लाटेचा जोर ओसरु लागताच अनेक राज्यांमधील निर्बंध आता हळूहळू शिथील होत आहेत. याचनुसार आता कोरोना संकटामुळे बंद सर्व स्मारकांना खुले करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने देशातील सर्व स्मारकांना 16 जूनपासून खुले करण्याची घोषणा केली आहे. यापूर्वी 15 एप्रिल रोजी देशातील सर्व स्मारकांना बंद करण्याचा आदेश देण्यात आला होता.
केंद्रीय पर्यटन आणि संस्कृती राज्यमंत्री प्रल्हाद पटेल यांनी सोशल मीडियावरून निर्णयाची घोषणा केली आहे. पर्यटकांना कोरोना नियमांचे पालन करत स्मारकांना भेट देता येणार असल्याचे त्यांनी ट्विटरवर नमूद केले आहे.
आदेशानुसार आर्कियोलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या अधीन येणारी सर्व स्मारके आणि संग्रहालये खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित राज्यांच्या दिशानिर्देशांचे पालन करावे लागणार असल्याचेही म्हटले गेले आहे. मागील वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान ताजमहाल आणि अन्य स्मारकांना 17 मार्चपासून बंद ठेवण्यात आले होते. कोरोनामुळे पर्यटन उद्योगाचे प्रचंड नुकसान झाले आहे. विदेशी पर्यटक येत नसल्याने व्यावसायिक आणि पर्यायाने देशाला फटका बसला आहे.