ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरस थैमान घालत आहे. भारतात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. देशात दिवसाला कोरोनाचे साधारण 1500 रुग्ण मिळत आहेत. 3 मे नंतर हे प्रमाण वाढले मात्र, 12 मे नंतर हा आकडा पुन्हा खाली येईल आणि 16 मे नंतर देशात एकही कोरोना रुग्ण आढळणार नाही असा दावा नीती आयोगाचे सदस्य आणि सरकारच्या वैद्यकीय व्यवस्थापन समितीचे प्रमुख व्ही. के. पॉल यांनी केला आहे.
पॉल यांनी नुकताच एक अहवाल सादर केला. यामध्ये ते म्हणतात की, लॉक डाऊन मुळे कोरोनाच्या प्रसाराचा वेग मंदावला आहे. तसेच कोरोना रुग्णांची संख्या डबल होण्याचा कालावधी ही दहा दिवसांपर्यंत वाढला आहे. त्यामुळे सध्या देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत असली तरी 16 मे नंतर भारतात कोरोनाचा एकही रुग्ण आढळणार नाही, असं पॉल यांनी म्हटले आहे.
दरम्यान, याच समितीमधील एका सदस्याने पॉल यांचा दावा फेटाळून लावला. ते म्हणाले, गुजरात, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल यासारख्या हॉटस्पॉट ठिकाणांची रुग्ण संख्या जो पर्यंत कमी होत नाही, तोपर्यंत राष्ट्रीय सरासरी कमी होणार नाही.
तसेच आगामी काळात कोरोनाच्या प्रसाराचा वेग कमी होईल याचा कोणत्याही पुरावा नाही. त्यामुळे सध्या आम्ही अजून दीर्घकाळ कोरोना राहील असे गृहीत धरून अधिकाधिक आयसीयू, व्हेंटिलेटर आदी साहित्याची तरतुद करत आहोत, असं ही त्यांनी यावेळी सांगितले.