दर महिन्याला होते 30 हजार रुपयांची कमाई
राजस्थानमध्ये अशा अनोख्या गोष्टी आहेत, ज्या जाणून दंग व्हायला होते. रेल्वेस्थानक रेल्वे विभागाकडून चालविले जाते, परंतु राजस्थानच्या नागौरमध्ये एक असे स्थानक आहे, जे सर्वसामान्य लोक चालवितात. जालसू नानक हाल्ट रेल्वेस्थानक हे देशातील एकमात्र असे स्थानक आहे जे ग्रामस्थ चालवतात. नागौर जिल्हा मुख्यालयापासून 80 किलोमीटर अंतरावर जालसू नानक हॉल्ट हे देशातील एक विशेष रेल्वेस्थानक काहे.
ग्रामस्थच तिकीटविक्री करतात आणि स्थानकाची देखभाल देखील करतात. एवढेच नाही तर जालसू नानक हॉल्ट रेल्वेस्थानकापासून रेल्वेला दरमहिन्याला सुमारे 30 हजार रुपयांचे उत्पन्न देखील मिळते. ग्रामस्थ सुमारे 17 वर्षांपासून या रेल्वेस्थानकाचे संचालन करत आहेत.
रेल्वेच्या एका धोरणांतर्गत जोधपूर रेल्वे विभागाच्या अंतर्गत येणाऱया कमी उत्पन्न मिळवून देणाऱया स्थानकांना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याच अंतर्गत 2005 मध्ये जालसू नानक हॉल्ट रेल्वेस्थानक बंद करण्यात आले. या निर्णयाला ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला आणि 11 दिवसांपर्यंत धरणे आंदोलनही केले. मग रेल्वेने ग्रामस्थांसमोर स्थानक सुरू करायचे असल्यास ते त्यांनीच चालवावे अशी अट ठेवली. दर महिन्याला 1500 तिकिटे आणि प्रतिदिन 50 तिकिटांची विक्री करावी लागेल अशी रेल्वेची अट ग्रामस्थांनी मान्य केली होती.
सैनिकांसाठीचे रेल्वेस्थानक
राजस्थानच्या नागौर जिल्हय़ातील जालसू नानक हाल्ट स्थानक हे सैनिकांसाठी प्रसिद्ध असलेल्या गावात निर्माण करण्यात आले आहे. या गावातील दर दुसऱया घरात एक सैनिक असल्याचे बोलले जाते. या गावातील 200 हून अधिक जण सैन्य, बीएसएफ, नौदल किंवा वायुदलात कार्यरत आहेत. तर 200 हून अधिक निवृत्त सैनिक आहेत. सुमारे 45 वर्षांपूर्वी या हॉल्ट स्थानकाला सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी सुरू करण्यात आले होते. 1976 मध्ये जालसू नानक हॉल्ट स्थानकाला मान्यता मिळाली होती.